मुंबई: जसजशी दिवाळी जवळ येऊ लागली आहे, राज्यातील नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने दक्ष राहण्याचे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. कोरोनाची आज रुग्णबाधितांची संख्या कमी होत असली तरी ती कायम तशीच टिकवण्याचे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचे थंडीतील वर्तन कसे असेल हे आताच सांगणे मुशकील आहे. त्यामुळे सगळ्याच नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे. विशेष म्हणजे  येत्या काळात दिवाळीच्या सणानिमित अनेक नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर गर्दी होऊ शकते. अशा काळात संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभाग सज्ज आहे. यामध्ये त्यांचे लक्ष 'सुपर स्प्रेडर' यांच्यावर असणार असून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.


संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा


काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक  घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. त्यांनी त्यावेळी ज्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.


कोण आहेत सुपर स्प्रेडर?
ज्यांना सुपर स्प्रेडर असे संबोधित करण्यात आले आहे, या लोकांच्या सानिध्यात अनेक लोकांचा दैनंदिन कामाच्या निमित्ताने संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा लोकांच्या चाचण्यांवर भर द्यावा असे मत वैद्यकीय तज्ञांनी आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त  केले आहे.  त्याचवेळी, राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे 500 लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविण्यात येणार आहे.


दुसऱ्या टप्प्यात विषाणू दुप्पट वेगाने वाढतो!


विशेष म्हणजे रविवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला.  त्यावेळी, त्यांनी दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की इटली, स्पेन,इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे.काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणू दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढतांना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत, आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे ही आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत असे म्हटले आहे.


दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते?
या बैठकीला उपस्थित असणारे शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले कि, " सध्या  हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात 10 अंश सेल्सिअसचा फरक दिसत आहे. या अशा वातावरणात विषाणूंची वाढ मोठ्या प्रमाणत होत असते. तसेच मोठ्या प्रमाणात सध्या प्रदूषण आणि धुके आहे, हवा कोरडी झालेली आहे. त्यात दिवाळी निम्मित खूप मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यांवर मास्क न घालता उतरले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. जर असे होऊ नये असे वाटत असेल तर लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या लोकांच्या सानिध्यात लोकांचा व्यवसायाच्या निमित्ताने अधिक संपर्क येतो अशा सर्व लोकांच्या चाचण्यावर भर देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच टेस्टिंग मोठ्या प्रमाणात  वाढविले पाहिजे यावर एकमत झाले असून पूर्ण क्षमतेने काम आहे त्या टेस्टिंग लॅबचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. नागरिक टेस्टिंग साठी रुग्णलयात येणार नाही, त्यामुळे त्याच्या घरी जाऊन टेस्टिंग करणे गजरेचे ठरणार आहे."