Virar Latest News Update: नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर 16 भारतीयांना बंदी करण्यात आले आहे. यामध्ये  विरारमधील प्रणव संतोष शिंदे या तरुणाचा समावेश आहे. प्रणवच्या सुटकेसाठी त्याची आई गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही साकडे त्यांनी घातलं. पण अद्याप सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेलं नाही.  प्रणव संतोष शिंदे याच्या सुटकेसाठी त्याची आई संपदा शिंदे मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि प्रसार माध्यमांचे उंबरठे झिजवते आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांच्या सुटकेकरता प्रयत्न करावेत, अशी याचना त्यांनी सर्वांना केली आहे. याच मागणीसाठी संपदा शिंदे यांनी 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


विरार-मनवेल पाडा येथील वेदश्री सोसायटीत राहणाऱ्या संपदा शिंदे यांचा मुलगा प्रणव संतोष शिंदे हा ओएसएम फिल्ट मॅनेजमेंट या शिपिंग कंपनीत शेफ म्हणून नोकरी करतो. चेन्नई येथील ही कंपनी नायजेरिया येथे क्रूड ऑइल काढणाऱ्या जहाजाला सेवा देत आहे. प्रणव 18 जुलै रोजी या कंपनीत कामाला लागला होता. नऊ ऑगस्टपासून हे जहाज नायजेरियातील इक्वेटोरियोल गिनीमध्ये आहे. या ठिकाणी बेकायदेशीर क्रूड ऑइल उचलले म्हणून हे जहाज नायजेरियामध्ये नजरकैदेत आहे. या जहाजावर एकूण 26 सिफेअर्स आहेत. त्यात 16 भारतीयांचा समावेश असून; त्यात प्रणव हा विरारचा आहे. त्यांना नायजेरिया-मेलाबो येथे ताब्यात घेण्यात आले आहे.


मागील तीन महिने या सिफेअर्ससोबत गैरव्यवहार करण्यात येत आहेत. त्यांना अन्नपाणी दिले जात नाहीये. त्यांच्याकडील संपर्काची साधनेही काढून घेण्यात आलेली आहेत. प्रणवने फेसबुकच्या माध्यमातून माहिती आपल्याला दिल्याचं संपदा शिंदे यांनी सांगितलं. एकाच खोलीत जमिनीवर या सगळ्यांना बसवून ठेवलेले आहे. तिथं त्यांची स्थिती बिकट आहे. यातील अनेकजण यामुळे आजारी पडलेले आहेत. त्यांच्यावर औषधोपचारही केले जात नाहीत. जहाज मालकाने दंड भरल्यानंतरही त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई कमी करण्यात आलेली नाही. 


नवी मुंबईतील ऑल इंडिया सिफेरस युनियनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिपिंग केंद्रीय शिपिंग मंत्री सरबानंद सोनिवाल यांना याबाबत पत्र लिहून या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान; विरार येथे राहणाऱ्या संपदा शिंदे यादेखील आपल्या मुलाच्या काळजीने स्थानिक नेते, मुख्यमंत्री आणि प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने त्यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.