मुंबई : विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता आता संपणार आहे. कारण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील कुलगुरूंच्या बैठकीत एकाही विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धत, वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे. त्यादृष्टीने पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, पुढील दोन दिवसात या परिक्षांबाबत योग्य तो निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
विद्यापीठाच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे 2 तास ही बैठक झाली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ हे सहभागी झाले.


परिक्षा नेमकी कधी होणार? पालक, विद्यार्थी चिंतेत
मुख्यमंत्री यांनी या बैठकीत चर्चा करताना सांगितलं की, 'कोरोनाच्या संकटामुळे सगळ्याच गोष्टी पुढे गेल्या आहेत. अगदी आर्थिक वर्ष पुढे गेले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचे याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत. पण आता परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विशेष प्राधान्याने हाताळावा लागणार आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील परीक्षेच्या अनिश्चिततेची भिती संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे' त्यामुळे या गोष्टींवर या बैठकीत सखोल चर्चां करण्यात आली.

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र
अनेक हुशार विद्यार्थी परीक्षा वेळेवर होऊ शकलेल्या नाहीत म्हणून चिंतेत आहेत. त्यामुळे पर्यांयाचा आणि नेमक्या पद्धतीचा विचार करू. एकाही विद्यार्थ्याला प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा घेऊ. सरासरी गुण किंवा श्रेणी आणि रोजगार किंवा उच्च शिक्षणासाठी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या गुण/श्रेणी मिळविण्यासाठी परीक्षा देण्याची ऐच्छिक सुविधा यांसह विविध पर्यांय कायदेशीर तसेच त्यातील प्रत्यक्ष कार्यवाहीची पद्धती पडताळून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, कुलगुरूंसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच वारंवार चर्चा करण्यात येत आहेत. त्या-त्या प्रदेशातील परिस्थिती समजावून घेतली जात आहे. यात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार करतो आहोत. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून प्रयत्न करतो आहोत. परीक्षा घ्याव्यात याच दृष्टीने पर्यांयाचा विचार केला जात आहेत.

Higher Education Council | अंतिम वर्षाच्या परीक्षांचं काय होणार?माझा शिक्षण परिषद- उच्च शिक्षण विशेष