Uddhav Thackeray : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंसमोर सत्ता टिकवण्याचं तगडं आव्हान असणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था चक्रव्यूहमध्ये फसलेल्या अभिमन्यूसारखी होऊ शकते. महाभारतामध्ये अभिमन्यू जसा चक्रव्यूहमध्ये फसला होता, त्याला नातेवाईक आणि जवळच्या लोकांनी चक्रव्यूहमध्ये फसवले होते तशीच काहीशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर ओढावली आहे. उद्धव ठाकरे यांचे आधीचे सहकारी त्यांच्यासाठी चक्रव्यूह तयार करत आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिपोत्सवच्या निमित्ताने एकत्र आले होते.  दिवाळीच्या निमित्ताने मागील दहा वर्षांपासून राज ठाकरे शिवाजी पार्कवर दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करतात. पण यंदा दिपोत्सवच्या निमित्ताने तीन वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  या कार्यक्रमादरम्यान कोणतेही राजकीय भाष्य करण्यात आले नसले तरी तिन्ही नेते एकत्र आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण पुढील वर्षी मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहेत, त्यापार्श्वभूमीवर तिन्ही राजकीय नेत्यांनी तयारी सुरु केली आहे का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. 
 
एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप राज्यातील पुढील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढणार यात शंका नाही.  तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी करा, असे निर्देश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. पण भाजप मनसेसोबत पडद्यामागून काहीतरी राजकीय खेळी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, मागील काही दिवसांपासून भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.  


अनेकवेळा राज ठाकरेंच्या भेटीसाठी भाजपचे नेते त्यांच्या घरी गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे पडद्याआड काहीतरी सुरु असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या मराठी मतांवर अवलंबून आहे, त्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप राज ठकरेंच्या मनसेचा वापर करु शकतो. राज ठाकरेंकडे गमावण्यासारखे काहीच नाही. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत 227 पैकी फक्त सात नगरसेवक राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणून आले होते. या सात नगरसेवकामधील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेचा फक्त एक नगरसेवक राहिला होता. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्रही सोडलं होतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उघड किंवा छुप्या पाठिंब्याच्या मदतीनं राज ठाकरे आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची संधी शोधत आहेत.
  
अशा परिस्थितीत, उद्धव ठाकरेंची अवस्था महाभारतामधील चक्रव्यूहमध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. चुलत भावाचा सामना करावा लागतोय, त्याशिवाय सर्वात जवळील आणि एकेकाळी विश्वासू असलेल्या एकनाथ शिंदे यांचाही सामना करावा लागतोय. तसेच अनेक वर्ष युतीमध्ये असलेल्या भाजपासोबतही उद्धव ठाकरेंना दोन हात करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंना कोण बळ देणार? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे दोन प्रमुख घटक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत तितकीशी ताकद नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची थोडीफार मदत होऊ शकते. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु आहे. मुंबईत स्वबळावर लढण्याची चर्चा मुंबई काँग्रेसमध्ये सुरु आहे. एकीकडे चुलतभाऊ, जुने सहकारी यांना तोंड देत असतानाच स्वत:चा पक्ष बांधणी करण्याचेही आवाहन उद्धव ठाकरेंसमोर आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे मुंबईच्या राजकारणातील चक्रव्यूह कसा फोडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.