Continues below advertisement


मुंबई : सध्याचे सरन्यायाधीश हे कर्तव्यदक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी आता लोकशाही वाचवली पाहिजे. तीन-चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडत आहे, तिला न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीस भूषण गवई यांना केली. मार्मिकच्या 65 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.


शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याच्यावर लवकरच अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.


लोकशाही कधी प्राण सोडेल सांगता येत नाही


उद्धव ठाकरे म्हणाले की, "दिल्लीमध्ये न्यायालयाने सांगितलं की रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडा. मग कुणीतली म्हटलं की कुत्र्यांना पकडलं तर झाडावरील माकडं रस्त्यावर येतील. पण अशी माकडं संसदेत पोहोचली आहेत."


आपले सरन्यायाधीश यांनी दिल्लीतील या भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सांगितलं आहे. ते कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश आहेत, त्यामुळे त्यांचे आभार असं उद्धव ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "याच सरन्यायाधीशांना मी विनंती करतोय की, आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर आपली लोकशाही तडफडत आहे. तीन वर्षे झाली, चार वर्षे झाली, ती कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. तुम्ही आता चौथे सरन्यायाधीश, त्या लोकशाहीच्या तोंडात जर का न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातील लोकशाही मरेल. त्यामुळे खंडपीठ कोणतंही असलं तरी तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला अशी मी हात जोडून विनंती करतो."


तोपर्यंत मार्मिकचं काम थांबणार नाही


उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणण्यापेक्षा ती मराठी माणसाने मिळवली. आजही मुंबईचा लचका तोडता येईल का याचा प्रयत्न मध्ये मध्ये चोची मारून केला जातो. मग तो हिंदी सक्तीचा विषय असेल किंवा मुंबईचं महत्व मारण्याचं निमित्त असेल, हे प्रयत्न काही थांबले नाहीत. असे प्रयत्न करणाऱ्याला आपण जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचे काम काही थांबणार नाही."


देशातल्या आणि राज्यातल्या मूळ प्रश्नांपासून आपलं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मग तो कधी कबुतरांचा वाद असतो किंवा रस्त्यावरच्या कुत्र्यांचा वाद असतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.