मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल उशिरा रात्री ही भेट झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्य़ांनी ट्विटरवरुन दिली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी विस्तृत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे.
त्यामुळेच भाजप-शिवसेनेत मंत्रिपदाचे दावेदार, विभागांचं वाटप आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद निश्चित होत नाही तोपर्यंत विस्तारावर निर्णय होणार नाही, अशी चर्चा सुरु आहे. या सर्व कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.
शिवसेनेत अंतर्गत कलह?
एकट्या भाजपातच नाही, तर मातोश्रीच्या आदेश मानणाऱ्या शिवसेनेतही अंतर्गत कलह सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केल्याचं दिसतं. तसंच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे.