नवी मुंबई : नवी मुंबई ते आलिबाग अंतर तीन तासांवरून फक्त एक तासात पार करण्यात येणार आहे. बोट प्रवासाच्या मरिना सेंटरचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बोट टर्मिनस 111 कोटींचे आहे. नवी मुंबईवरून आलिबागला जाण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. तर मुंबई गाठण्यासाठी एक तास अपुरा पडतो. मात्र भविष्यात हे दोन्हीकडे पोहचण्याचा वेळ कमालीचा घटणार आहे.


नेरूळ येथे उभे राहत असलेल्या मरिना सेंटर मधून सुटणाऱ्या बोटी अलिबागला फक्त एक तासात आणि मुंबईला अर्धा तासात पोहचणार आहेत. 111 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून एक वर्षात तो कार्यरत होणार आहे. रस्ते आणि रेल्वे प्रवासावर मर्यादा येत असल्याने राज्य शासनाच्या मेरिटाईम बोर्डाकडून पर्यायी सागरी वाहतूकीकडे विशेष लक्ष देण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे नवी मुंबईत उभा राहत असलेले नेरूळ येथील मरिना सेंटर सिडको आणि मेरिटाईम बोर्डाकडून 111 कोटी खर्च करून बोट टर्मिनसची उभारणी नेरूळ खाडीत केली जात आहे.

मरिना सेंटर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाहून नेरूळ ते अलिबाग , नेरूळ ते मुंबई अशा बोटी सुटणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात ठाणे , वसई विरार आणि कल्याण डोंबिवली शहराला बोटींच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. विना प्रदूषण, विना वाहतूक कोंडी, कमी वेळेत आणि कमी खर्चात बोटीने इच्छित स्थळी पोहचतां येणार असल्याने लोकांनाही याची उत्सुकता लागली आहे. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे , सिडको आधिकारी आणि मेरिटाईम बोर्डाच्या आधिकार्यांनी या मरिना सेंटरला भेट देत याची पाहणी केली. सध्याच्या कामाची गती पाहता येत्या सहा महिन्यात या बोट टर्मिनची उभारणी पूर्ण होणार असल्याचे यावेळी ठेकादारांकडून सांगण्यात आले. भव्य अशा बोट टर्मिनसवर प्रवाशी तिकिट खिडकी, फूड कोर्ट, प्रतिक्षा कक्ष , कार आणि बस पार्किंग अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.