Wireless Technology : वायरलेस तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. तुम्ही मोबाइलवर बोलताना फोरजी एलटीई नेटवर्क असते आणि अचानक ते थ्रीजी किंवा टूजी होते. त्यानंतर आवाज कमी होतो किंवा कॉलड्रॉपसारख्या समस्या येतात. मात्र यापुढं आता हा त्रास दूर होणार आहे. वायरलेस तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अभय करंदीकर यांच्या टीमनं केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाला यश आलं आहे.


दरम्यान, वायरलेस तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधनाला यश आल्यानं अनेक समस्या दूर होणार आहेत. भारतीय प्रयत्नातून प्रथमच आयईईई स्टॅन्डर्ड (मानक) तयार झाले आहे. यामुळं कॉलड्रॉपसारख्या समस्या दूर होणार आहेत. तसेच इंटरनेट कॉलवरील रिकनेक्टिंगसारख्या समस्या देखील दूर होणार आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करणे यामुळं शक्य होणार आहे. यामुळं 'वायरलेस' क्षेत्रासाठी नवीन मानकं निश्चित झाली आहेत. भारतात संशोधन झालेलं इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील हे पहिले मानक असल्याची माहिती डॉ. करंदीकर यांनी दिलीय. या तंत्रक्षानाचा सामान्य लोकांसोबतच डिफेन्स क्षेत्राला देखील मोठा फायदा होणार आहे. 2016-17 मध्ये संशोधनाला सुरुवात केल्यानंतर वायरलेस नेटवर्क नियंत्रित करणारी 'सॉफ्टवेअर डिफाइन्ड नेटवर्किंग' प्रणाली विकसित, नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांना फ्रिक्वेन्सी बदल करणे शक्य होणार आहे. 


याचबरोबर 'फाइव्ह जी नेटवर्क' देशातील ग्रामीण भागात पोहोचावे, यासाठी 'फ्रूगल फाइव्ह जी'वर संशोधन सुरु आहे. सध्या फाइव्ह जीचे नेटवर्क हे 500 किमी प्रतितास प्रवास करताना किती प्रभावीपणे काम करु शकते, यावर चाचण्या झाल्या आहेत. मात्र, भारतातील ग्रामीण भागात कमी फ्रिक्व्हेन्सीच्या भागातही हे नेटवर्क कसे काम करु शकते, याचे हे संशोधन आहे. याचेही मानक तयार करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार क्षेत्रात अनेक मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्याचा वापर आपण सध्या करत आहोत. मात्र वायरलेसचे हे मानक पूर्णपणे भारतात संशोधन करुन निश्चित करण्यात आलेलं पहिलंच मानक आहे.