मुंबई : राज्य शासनाने दीड वर्षांपूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली होती. त्यानुसार या स्मारकाच्या कामकाजासाठी गोवंडी येथे सुसज्ज असे कार्यालय थाटले. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयाचे शासनाकडून भाडे भरण्यात आले नाही. परिणामी जागा मालकाने या कार्यालयाला टाळे ठोकले असून याठिकाणी काम करणारे कर्मचारी सध्या कार्यालयाबाहेरच बसून कामकाज करत आहेत.


सप्टेंबर 2017 मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे निवासस्थान असलेल्या घाटकोपरच्या चिराग नगर येथे हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 300 कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अधारे या कार्यालयात एकूण 19 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु कामावर रुजू झाल्यापासून आतापर्यंत एकाही कर्मचाऱ्याला अद्याप पगार मिळालेला नाही.

निधी मिळत नसल्याने कार्यालयासाठी बनवण्यात आलेल्या फर्निचरचे पैसे, स्टेशनरीचे पैसे, वीज बील, टेलिफोन बील, पुष्पहाराचे बील अशी प्रकारची अनेक देणी बाकी आहेत. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून कार्यालयाचे भाडेदेखील न दिल्याने जागा मालकाने या कार्यालयाबाहेर नोटीस लावून कार्यालयाला टाळे ठोकले आहे. परिणामी गेल्या चार दिवसांपासून येथील कर्मचारी कार्यालयाबाहेरच बसून त्यांची कामे करत आहेत.