मुंबई : मालाड इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 17 जण गंभीर जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 


या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचावकार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले होते. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करत होते.  मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयात हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.






पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती शोकभावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,  या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत  जाहीर केली  आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :