नवी मुंबई :  दि बा पाटील (Di Ba Patil) यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport)देण्यात यावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कळवा नाका आणि कळवा नाका इथपासून ते नवी मुंबई पर्यंत साखळी आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असताना बाळासाहेबांऐवजी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न देता प्रकल्पग्रस्तांचे नेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आज मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई , पनवेल , उरण , ठाणे , मुंबई येथील आगरी - कोळी जनतेकडून हे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाला भाजप आणि आरपीआय पक्षाकडून जाहिर पाठिंबा देण्यात आला होता. उरण ते पनवेल, पनवेल ते नवी मुंबई, नवी मुंबई ते ठाणे, ठाणे ते मुंबई अशा पद्धतीने हायवेवर मानवी साखळी करून दि बा पाटील यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .


विमानतळाच्या नामकरणावरून राजकीय वाद


गेल्या काही महिन्यांपासून नवीमुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू आहे. नवी मुंबईचे निर्माण हे स्थानिक आगरी- कोळी- कराडी प्रकल्पग्रतांच्या जमिनीवर करण्यात आले आहे. याच जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून या विमानतळाच्या नामकरणावरून राजकीय वाद सुरू झाले आहेत. त्यातच, नवी मुंबईची प्लॅनिंग ऑथोरिटी असलेल्या सिडकोने नुकताच या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव केला आहे.  तर, राज्यशासन देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, स्थानिक भूमीपुत्रांनी एकत्रित येत प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि  सिडको आंदोलनातून संपूर्ण देशाला न्याय देणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या नावाची आग्रही मागणी करण्यात येत आहे. 



 गावकऱ्यांनी मानवी साखळी तयार केली


मात्र, राज्यशासनाकडून याबाबत कोणताही ठाम निर्णय घेतला जात नसल्याने आज सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त कृती समितीमार्फत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी, उरण ते जासई दरम्यान सुमारे 10किलोमीटरच्या टप्यामध्ये स्थानिक गावकऱ्यांनी मानवी साखळी तयार करत लोकनेते दि . बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, केंद्र सरकारच्या माध्यमातून विमानतळ प्राधिकरण मंत्रालयामार्फत हे नाव निश्चित करण्यात येत असताना सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता चुकीचा निर्णय  घेण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला. तर बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे नेते असल्याने राज्यातील इतर प्रकल्पाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली. तर, राज्य शासन आणि केंद्र शासनाने जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा विचार करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. 


कोण आहेत दि बा पाटील 


- दि बा पाटील यांचा जन्म 13 जानेवारी 1926रोजी जासई , उरण येथे झाला 
- वकिलीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली 
- पनवेल - उरण विधानसभा मतदारसंघाचे ते चार वेळा आमदार होते. 
- रायगड लोकसभेचे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते .
- 1999 मध्ये दि बा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करीत लोकसभा लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणूकीत पराभव झाला होता. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला 
- सिडकोने 1970 साली नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी नवी मुंबई, पनवेल उरण भागातील 97 गावांच्या जमिनीचा ताबा घेतला होता. घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात तुटपुंजी मदत आगरी-कोळी जनतेला केली होती.
- याला विरोध करीत दि बा पाटील यांच्याकडून आंदोलन उभा करण्यात आले. यात 5 शेतकरी हुतात्मे झाले. तर 100 जण जखमी झाले होते. 
- अखेर महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत भरीव मदत करण्यास सुरवात केली. घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात 12.5 टक्के विकसीत भूखंड देण्यात आले.
- जेएनपीटी बंदराच्या उभारणीतही शेतकरी वर्गाच्या जमिनी घेतल्या नंतर दि बा पाटील यांनी वयाच्या 87 व्या वर्षी ॲम्ब्युलन्समधून येत आंदोलन केले होते.