मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाली. बोटीत असलेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बोटीवर असलेले शिवसंग्रामचे 18 ते 20 कार्यकर्ते सुखरुप आहेत.


अपघातानंतर सिद्धेश पवार हा कार्यकर्ता बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली होती. त्यानंतर बोटीत सिद्धेशचा मृतदेह आढळला. गिरगाव चौपाटीजवळ अरबी समुद्रात आयोजित केलेला शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम अपघातानंतर रद्द करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांकडून मयत सिद्धेश पवारच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला होता. अपघातानंतर बोट समुद्रात बुडाली.

अपघातावेळी स्पीड बोटमध्ये असलेल्या अनेक जणांना वेळीच बाहेर काढल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. दुसरी बोट घटनास्थळी गेल्यानंतर बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली.


तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर बचावासाठी घटनास्थळी दाखल झाली. तसंच दोन बोटींच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं. याशिवाय अग्निशमन दलाचे जवानही किनाऱ्यावर पोहचले. अपघातामुळे पायाभरणीचा शुभारंभ रद्द करण्यात आला.

शिवस्मारक पायाभरणी : बुडणाऱ्या बोटीवरील तरुण सांगतो..

दरम्यान, नियोजनशून्यतेमुळे हा अपघात झाल्याची टीका शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवल्याचा आरोपही पाटलांनी केला. बचावकार्यासाठी आपण दोन बोटी पाठवल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली. पायाभरणी कार्यक्रमाला जाताना तटरक्षक दलाला सोबत का नेलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवस्मारक पायाभरणीला जाताना बुडालेल्या स्पीडबोटमधून एक जण वगळता सर्वांना वाचवलं, वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

शिवस्मारकाची पायाभरणी

एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार होती. पुढच्या 36 महिन्यांत अर्थात तीन वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकीक असणार आहे.

पाहा अपघातग्रस्त बोटीचे फोटो

आघाडीच्या सरकारच्या काळात हे स्मारक घोषित झाले. या स्मारकासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या दोन वर्षांत मिळाल्या. तसेच या स्मारकाचे जलपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अरबी समुद्रात 15 हेक्टरच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार असून पहिल्या टप्प्याच्या कामाचा खर्च राज्य सरकारने अंदाजे अडीच हजार कोटी रुपये नि‌श्चित केला आहे.



या शिवस्मारकात काय असणार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. या स्मारकातील मुख्य आकर्षण असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.

पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल.

समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखवण्यासाठी दालन, वस्तूसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.

स्मारकाची जागा राजभवनापासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.6 कि.मी अंतरावर आहे. स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.