मुंबई: मुंबईतील मतदार याद्यातून लोकांची नावं गायब झाल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. याप्रकरणी शिवसेनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.


‘11 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते.’ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज म्हणाले.

याप्रकरणी, आता शिवसेना लवकरच कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. यासाठी शिवसेनेनं शिवसेना भवनात टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था केली आहे. यावर मतदार तक्रार नोंदवू शकतात. तसंच याप्रकरणी शिवसेनेच्या शाखांमध्येही तक्रार नोंदवता येणार आहे. या सर्व तक्रारी शिवसेना कोर्टात सादर करणार असल्याचं समजतं आहे.

मुंबईत मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याची शंका आहे. कारण 2012च्या निवडणुकीत जी नावं होती त्यातील तब्बल 11 लाख नावं यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे हे मतदारांना मतदानाचा हक्कापासून यंदा वंचित राहिले.

विशेषतः मालाड, घाटकोपर, वरळी, बोरिवली या ठिकाणच्या मतदारांची नावं गायब असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी विधानसभा निवडणुकीला मतदान केलं होतं. पण आता नावं यादीतून वगळण्यात आल्याचं समोर आलं.

संबंधित बातम्या:
मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ, 11 लाख मतदारांची नावं गायब