मुंबई: ‘मुंबईत आम्हाला सत्ता मिळो किंवा न मिळो मात्र, आम्ही काँग्रेससारख्या पक्षासोबत जाणार नाही. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर त्यांना रोखणार नाही.’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. नगरपालिकांच्या निवडणुकानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आज भाजपनं मुंबईत सेलिब्रेशन केलं. त्यावेळी आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.


‘भाजप लाटेत निवडून आला तर ती लाट विश्वासाची आहे. महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्ष सगळ्या पक्षांची एकत्रित बेरीज केली तर त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.  शहर असो वा गाव सगळ्यांनी भाजपवर विश्वास दाखवला.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘आम्हाला सत्ता मिळो व ना मिळो, काँग्रेससारख्या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. कुणाला त्यांच्याबरोबर जायचं असेल तर जावं. काँग्रेसला जनतेने पराजित केलं. त्यामुळे भाजप विचारांची लढाई लढत राहील. पारदर्शी अजेंडावर तडजोड आपण करणार नाही. जे येणार नाही त्यांच्याशिवाय चालायचं. आपल्यासोबत ज्यांना यायचं आहे त्यांना आपण सोबत घेऊ.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणला.

‘मुंबईत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला. या निवडणुकीत सर्व समाज भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. कोण म्हणतं मराठी माणसाने मत दिल नाही? गिरगावात आपण निवडून आलो. गुजराती, मराठी, अल्पसंख्यांक, दक्षिण भारतीय सगळ्यांनी भाजपला मतं दिली.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुंबईच्या महापौरपदाबद्दल योग्य वेळी भूमिका जाहीर केली जाईल. असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्यानंतर आज शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक शिवसेना भवनात झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवीन नगरसेवकांना महापौर मतदानाच्या दिवशी मतदानाची पद्धत कशी असते याची माहिती दिली गेली.

संबंधित बातम्या:
शिवसेनेनं महापौरपदासाठी काँग्रेसची मदत मागितली मात्र आमचा नकार: निरुपम

शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले

युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…

राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण