Shivsena On Bilkis Bano Case: 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडिता बिल्कीस बानोवरील अत्याचार प्रकरणातील (Bilkis Bano Case) दोषींना शिक्षा माफ केल्यानंतर भाजपच्या नेतृत्वातील गुजरात सरकारवर (Gujarat Government) देशभरातून टीका होऊ लागली असताना शिवसेनेनेदेखील भाजपवर (Shivsena slams BJP) निशाणा साधला आहे. बिल्किस बानोवर अत्याचार करणारे दोषी तुरुंगातून बाहेर येताच त्यांचे सत्कार घडवून आणले गेले, त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, हेच काय तुमचं हिंदुत्व (Hindutva) असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. बलात्कार व खुनास राजमान्यता व समाजमान्यता देण्याचा प्रकार घातक असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर बिल्किस असो की बिमला, तुमच्या किंकाळय़ांना विचारतंय कोण? असा उद्गिवन प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे. 


गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत बिल्किस बानोवर सामुदायिक बलात्कार करण्यात आला. तिचे घर जाळले. बिल्किसची आई व तिच्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या खटल्याची सुनावणी महाराष्ट्रात घेण्यात आली होती. महाराष्ट्रात चाललेल्या या खटल्यात बिल्किसवर अत्याचार करणाऱ्यांना आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 15 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने या दोषींची तुरुंगातून सुटका केली. या सुटकेवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 


काही गोष्टी धर्माच्या पलिकडे


शिवसेनेने मुखपत्र 'रोखठोक' मध्ये गुजरात सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने म्हटले की, काही गोष्टी धर्मापलीकडे जाऊन पाहायला हव्यात. मग तुम्ही धर्मनिरपेक्ष असा नाहीतर कट्टर हिंदुत्ववादी किंवा धर्मांध मुसलमान. पण आपले राज्यकर्तेच हे सर्व विसरू लागल्यावर जनतेकडून काय अपेक्षा करावी? गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणात तेच घडले आहे. राज्यकर्ते चूप आहेत हे समजू शकतो. पण समाजही थंड लोळागोळा होऊन पडला असल्याची खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे. 


खरे म्हणजे बलात्कार व हत्या अशा या खटल्यातील गुन्हेगारांना फासावरच लटकवायला हवे होते. पण जन्मठेपेवर निभावले. मात्र आता आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गुजरात सरकारने तुरुंगातील कैद्यांना सार्वजनिक माफीची घोषणा केली व बिल्किसच्या 11 गुन्हेगारांना ‘माफी’ देण्याचा निर्णय घेतला. हे सर्व गुन्हेगार बाहेर येताच त्यांचे सत्कार घडवून आणले गेले, त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. हे सर्व आपल्या हिंदू संस्कृतीत बसते काय? भाजपास जो हिंदुत्वाचा पुळका आहे त्या हिंदुत्वात नारी शक्ती व महिलांचा सन्मान यास महत्त्व आहे. पण इथले हिंदुत्व बलात्काऱयांना अभय देणारे व त्यांचा सत्कार करणारे आहे. आश्चर्य असे, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नारी शक्तीच्या गौरवाचा उल्लेख केला. पण त्यांच्या गुजरात राज्यातच एक बिल्किस बानो त्याच वेळी आक्रोश करीत होती, असेही शिवसेनेने म्हटले. 


पंतप्रधान, गृहमंत्र्यांचेही मौन


बिल्किस बानो कोण आहे? ती मुसलमान आहे म्हणून तिच्यावरील बलात्कार, अत्याचार, तिच्या मुलीची हत्या क्षम्य ठरत नाही. बिल्किसच्या जागी आपली आई, भगिनी असती तर? बाजूच्या पाकिस्तान आणि बांगलादेशात आपल्या हिंदू माय-भगिनींवर अत्याचार होतात तेव्हा आपण आक्रोश करतो. पण बिल्किस प्रकरणात ही अस्वस्थता, ती संवेदना कोठे गेली? या सर्व प्रकरणानंतर ना पंतप्रधान काही बोलले ना आपले गृहमंत्री. असे का? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. 


बलात्कारास राजमान्यता हे घातकच 


बलात्कार व खुनास राजमान्यता व समाजमान्यता देण्याचा प्रकार घातक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा श्री. अधिरंजन चौधरी यांनी करताच स्मृती इराणींपासून समस्त भाजपास तो नारी शक्तीचा अपमान वाटला व न्यायासाठी ते सर्व तोंडाची घंटा वाजवीत राहिले. श्रीमती इराणी यांचा संताप पाहण्यासारखा होता. मग बिल्किस प्रकरणात या सर्व घंटा थंड का? असा सवालही शिवसेनेने केला आहे. 


प्रश्न इथे हिंदू-मुसलमानाचा नाही. तर हिंदुत्वाचा आत्मा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठेचा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हिंदूंची मते मिळावीत म्हणून बिल्किसचे गुन्हेगार सोडले असतील तर ती प्रवृत्ती देशविघातक आहे. मग देशाला अतिरेक्यांपासून धोका आहे असे बोलण्यात अर्थ नाही. धोका तर देशातच आहे. धर्माचे रूपांतर धर्मांधता व अराजकतेत होत आहे असेही शिवसेनेने भाजपला सुनावले आहे. 


न्यायाची घंटा चोरीला गेली


शिवसेनेने रोखठोक सदरात जहांगीर बादशहाची गोष्ट नमूद करत देशातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. जहांगीर बादशहाने आपल्या राजवाडय़ाच्या प्रवेशद्वारावर एक न्यायाची घंटा बांधली होती. ज्याला न्याय हवा असेल, अशा कोणीही नागरिकाने ही घंटा वाजवली की बादशहा जहांगीर राजवाड्याचा बाहेर येईन न्याय देत असे. एकदा राज्यात चोरी वाढल्यामुळे नागरिकांनी बादशाहकडे धाव घेतली. जहांगीरने चोरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. काही दिवसांनी घंटेचे आवाज बंद झाल्याने बादशाह खूश झाला होता. मात्र, ती न्यायाची घंटाच चोरीला गेली असल्याची बाब कोतवालांनी त्यांना सांगितली. आपल्या देशातही नेमके असेच घडले आहे काय? तसे नसते तर एका अबलेला न्याय देण्यासाठी राज्यकर्ते पुढे सरसावले असते. समाज ‘जहांपनाह’च्या दरबारात घुसला असता, असेही शिवसेनेने म्हटले.