मुंबई : शिवसेनेची अंतर्गत गटबाजी अखेर चव्हाट्यावर आली आहे. कारण मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.


सायन कोळीवाड्यातून निवडून आलेले मंगेश सातमकर आणि तर वरळीतून निवडून येणारे आणि सलग चारवेळा नगरसेवकपद भूषवणारे आशिष चेंबूरकर यांचा त्यात समावेश आहे.

या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या जागी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. याआधीच मनसेतून आलेल्यांना पक्षात प्राधान्य दिल्यानं शिवसेनेत धुसफूस वाढली होती.



शिवसैनिकांमध्ये नाराजी

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतील नव्या नियुक्त्यांवरुन बरीच नाराजी पाहायला मिळाली होती. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी पोस्टरच्या माध्यमातून विचारला होता. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली होती.

काय लिहिलंय पोस्टरवर?

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?