Shiv Sena Chief Uddhav Thackrey :  शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनातून संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं. शिवाय त्यांनी यावेळी पुन्हा 2019 विधानसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत झालेल्या अडीच-अडीच वर्षांच्या सत्तेसंदर्भातील चर्चेवर भाष्य केलं. ठाकरे यांनी म्हटलं की, अमित शाह आणि माझं जे ठरलं होतं ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झालं असतं. अमित शाहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. ठरल्याप्रमाणं झालं असते तर भाजपचा अडीच वर्ष मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपला काय मिळाले, भाजपच्या मतदारांना काय आनंद मिळाला, यातून जनतेला काय मिळणार हे लवकरत कळेल असेही ते म्हणाले. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असत तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. तेव्हा नकार दिला, आता अस का केलं? शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री असं होऊ शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले.


एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार


उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार हवा. लोकशाहीचा घात करु नका, मतदारांच्या मतांचा आदर करा असेही ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, कांजूर मार्गाचा निर्णय कायम राहू द्या. मुंबईकरांच्या वतीनं मी विनंती करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असेही उद्धव ठाकरे म्हणाले.आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला.


तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही


 गेल्या काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या. माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी असल्याचे ठाकरे म्हणाले. माझं पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे. सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कदीही प्रतारणा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असेही ते म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे झालचं नसते असेही ठाकरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray PC: '...म्हणून माझा चेहरा आज उतरलाय!' उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे


Uddhav Thackrey : माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, आरेच्या निर्णयाचं दु:ख झालं : उद्धव ठाकरे