मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणूक निकालाबाबत आपली भूमिका मांडली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.


यापुढील कोणत्याही निवडणुकीत युती नाही अशी घोषणा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना वारंवार तुम्ही सरकारमध्ये आहात का, असा प्रश्न विचारला, मात्र आजचा दिवस लोकशाही वाचवण्याचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेत युती तोडण्याची घोषणा करणार की काय, असा प्रश्न होता. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे देशभरातील मीडियाचं लक्ष लागलं होतं.

पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. मात्र मी हा पराभव मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सेना ताकदीने लढली, भाजप घसरली

शिवसेनेने पहिल्यांदाच पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवली. वनगा कुंटुंबाला न्याय देण्यासाठी शिवसेना ताकदीने लढली. गेल्या निवडणुकीत भाजपचा 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला होता. मात्र यावेळी 8 लाखांपैकी 6 लाख मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. त्यामुळे भाजपची लोकप्रियता घसरली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पालघरमध्ये भाजपने साम-दाम-दंड-भेद वापरुन मिळवलेला विजय निसटता आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

निवडणूक यंत्रणा भ्रष्ट

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक यंत्रणेवरही हल्ला चढवला. ईव्हीएमचा घोळ लवकरात लवकर मिटवावा, अन्यथा सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक न लढवण्याबाबत विचार करायला हवा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच निवडणूक यंत्रणाही भ्रष्ट आहे. क्रिकेटप्रमाणे आता निवडणुकांसाठीही परदेशातून थर्ड अंपायर मागवायला हवेत, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

ईव्हीएम बंद

पालघर निवडणुकीत सुरुवातीपासूनच घोळ आहे. मग ती मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप असो, ईव्हीएममध्ये बिघाड असो वा आजच्या मतमोजणीतील आकडेवारीची तफावत असो. सर्वच पातळीवर निवडणूक यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची निवडणुकीद्वारे निवड करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

योगींची मस्ती उतरवली

देशभरात आज चार ठिकाणी लोकसभा पोटनिवडणूक होती. त्यापैकी उत्तर प्रदेशातील कैराना पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे यूपीच्या जनतेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मस्ती उतरवली असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, श्रीनिवास वनगा हरले! 

LIVE UPDATE


उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद


ईव्हीएमचा घोळ लवकरात लवकर मिटवावा, अन्यथा सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक न लढवण्याबाबत विचार करायला हवा : उद्धव ठाकरे


२०१९ ला आयपीएलसोबत निवडणुका घेणार का?


दिवसा उन्हामुळे ईव्हीएम बंद पडली, मग आता 'रात्रीस खेळ चाले' म्हणत रात्री मतदान घेणार का?


निवडणूक आयोग भ्रष्ट आहे, उद्धव टाकरेंचा थेट आरोप


पालघरमध्ये पराभव जाहीर झाला असला तरी मी याला पराभव मानत नाही - उद्धव


क्रिकेटप्रमाणे आता निवडणुकांसाठीही परदेशातून थर्ड अंपायर मागवायला हवेत


बुलेट ट्रेन, अहमदाबाद एक्स्प्रेस वे अशा कोणत्याही कामाला विरोध असेल, तर जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू : उद्धव ठाकरे

काही जणांना पैसे वाटताना पकडलं, एका रात्रीत लाखभर मतं कशी वाढली ह्याचे पुरावे द्या, निवडणूक आयुक्तपदासाठीही निवडणूक घ्या : उद्धव ठाकरे


निवडणूक यंत्रणा ही देखील भ्रष्ट आहे : उद्धव ठाकरे


मतदान यंत्रं ऐनवेळी बंद पडतात, निवडणूक यंत्रणा बिघडलेली आहे- उद्धव ठाकरे


पालघरमध्ये ईव्हीएम बंद पडली, निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीयांनी तक्रार करायला हवी


भाजपला आता मित्रपक्षांची गरज राहिलेली नाही - उद्धव ठाकरे


पालघरमध्ये भाजपचा निसटता विजय


उत्तर प्रदेशच्या जनतेने योगी आदित्यनाथ यांची मस्त उतरवली : उद्धव ठाकरे


योगी आदित्यनाथांनी पालघरमध्ये येऊन शिवरायांचा जो अपमान केला, त्याबद्दल भाजपने चकार शब्द काढला नाही


योगी आदित्यनाथांनी शिवरायांचा अपमान केला, मात्र अपमान झाला तरी आम्हाला विजय हवा, ही भाजपची भूमिका होती : उद्धव ठाकरे


भाजपची लोकप्रियता झपाट्याने घसरली : उद्धव ठाकरे


पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच लढवली, वनगा कुंटुंबाला न्याय देण्यासाठी शिवसेना ताकदीने लढली : उद्धव ठाकरे


पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवारांचं अभिनंदन : उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु


*********************


उद्धव ठाकरे असा कोणताही निर्णय घेणार नाहीत : चंद्रकांत पाटील


उद्धव ठाकरे सेनाभवनात दाखल


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरुन शिवसेना भवनाकडे रवाना


लोकशाहीचा खून करुन भाजपचा विजय. निवडणूक यंत्रणा, प्रशासन हाताशी धरुन भाजपने विजय मिळवला - एकनाथ शिंदे


पालघरमधील निकाल हा संशयाचा भाग. ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतमोजणीत अनेक फेऱ्यातील आकडे चुकीचे - एकनाथ शिंदे


 

2014 मधील विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

महाराष्ट्रात 2014 मध्ये 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत

भारतीय जनता पार्टी: 122 जागा, शिवसेना: 63 जागा, काँग्रेस: 42 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस : 41 जागा मिळाल्या होत्या.

याशिवाय अन्य छोट्या पक्षांपैकी  बहुजन विकास आघाडी: ३ जागा,शेतकरी कामगार पक्ष: ३ जागा,एमआयएम: २ जागा,भारिप बहुजन महासंघ: १ जागा,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष: १ जागा,महाराष्ट्र नवनिर्माण सेना: १ जागा,राष्ट्रीय समाज पक्ष: १ जागा,समाजवादी पक्ष: १ जागा, अपक्ष: ७ जागा

या निवडणुकीत, 122 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर 63 जागांसह शिवसेना दुसऱ्या स्थानी होती. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. सुमारे 25 वर्षांची शिवसेना-भाजप युती तुटली होती.

त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर 145 गाठण्यासाठी कोणाची तरी मदत घेणं आवश्यक होतं. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

12 नोव्हेंबर 2014 रोजी काय झालं?
अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने 12 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. प्रचंड गदारोळात ही प्रक्रिया पार पडली होती.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

मात्र याला शिवसेनेनेसह काँग्रेसने आक्षेप नोंदवत मतविभाजन करण्याची मागणी केली. पण विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची मागणी फेटाळली. कोणत्या पक्षाची किती मतं हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेने मतविभागणीची मागणी केली होती.

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी
सभागृहात गोंधळ सुरु असतानाच, नवनिर्वाचित अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली होती. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली होती.

राष्ट्रवादीचा ठपका पडू नये म्हणून खेळी केल्याचा आरोप
देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता, मात्र तो ठपका लपवण्यासाठी भाजपने आवाजी मतदानाची खेळी केल्याची चर्चा, त्यावेळी होती.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे बहुमत नाही, असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा असं आव्हान दिलं होतं. आवाजी मतदानावेळी कोणीच पोलची मागणी केली नाही, त्यामुळं आता कांगावा करणारे, तेव्हा काय करत होते असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला होता.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी विचारलं असता, "राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं त्यांचा आम्हाला पाठिंबा आहेच, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची मदत झाल्याचं स्पष्ट केलं होतं".

त्यामुळं निवडणुकीत राष्ट्रवादीवर टीका करत सत्तेपर्यंत पोहोचलेल्या भाजपला शिवसेनेचा विरोध होत असताना राष्ट्रवादीनंच तारल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं.

संबंधित बातम्या 

फडणवीसांनाही सिद्ध करावं लागलं होतं बहुमत, राष्ट्रवादी मदतीला धावली होती! 

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

..तर आमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणा, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आव्हान

देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

बहुमतासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याने भाजप नगरसेवकाचा राजीनाम्याचा इशारा  

शिवसेनेसाठी भाजपचे सर्व दरवाजे खुले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान