मुंबई :  महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे. केंद्राकडून राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घातला जातोय, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अनिल देशमुखांचं काय होणार, हा महाराष्ट्रापुढील किंवा देशासमोरील महत्वाचा प्रश्न नाही. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांच्या खांद्यावर बंदुक ठेवून सरकारवर निशाणा साधला जातोय, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, एकेकाळी परमबीर सिंह यांच्यावर शंका उपस्थित करणारे आज त्यांचा वापर करुन तोफा उडवत आहेत. परमबीर सिंह हे विरोधकांचं महत्वाचं शस्त्र आहे. केंद्रीय तपास यंत्रणांविषयी आमच्यात दुमत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत आहेत हा महाराष्ट्रावर घाला आहे. याबाबत शरद पवार यांचंही तेच मत आहे. मात्र एकदा तपास सुरु केल्यावर त्यांना सहकार्य करायला पाहिजे जे आम्ही करत आहोत, असं राऊत म्हणाले. 


Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची खुर्ची जाणार की राहणार? आज होणार महत्वाचा निर्णय


राऊत म्हणाले की, जोवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि दबावाशिवाय चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच्या बेछुट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की विरोधाचं राजकारण करायचं आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचं. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार करायचा. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.



प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली याबाबत विचारलं असता ते म्हणाले की,   प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटी-नाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणतंय किंवा एक केस बनतं. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकतं नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.