मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रविवारी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकले. संभाजीराजे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातून बोटीने मोदींनी (PM Modi) जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj memorial) ठिकाणी जाणार होते. मात्र, पोलिसांनी याठिकाणी संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली. पोलीस महाराष्ट्र स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना गाडीत डांबून ठाण्यात नेत होते. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत हस्तक्षेप केला.


माझे कार्यकर्ते हे काही आरोपी नाहीत. त्यांना कुठेही न्यायचे नाही. त्यांना आताच्या आता गाडीतून खाली उतरवा, असे संभाजीराजे यांनी पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या डीसीपी मुंडे यांना सांगितले. त्यानंतर डीसीपी मुंडे आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली आणि स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले. यानंतर संभाजीराजे यांनी एक छोटेखानी भाषण करत आपली भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी संभाजीराजे यांच्यासह 50 जणांना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन झालेल्या जागेपर्यंत जाण्यास परवानगी दिली. 


संभाजीराजेंचा पोलिसांवर दडपशाहीचा आरोप


सुरुवातीला पोलीस संभाजीराजे छत्रपती यांना अरबी समुद्रात बोटीने जायला परवानगी देत नव्हते. या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. त्यावेळी संभाजीराजे आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांना म्हटले की, तुम्ही दडपशाही करत आहात. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. आमचे आंदोलन हे केवळ प्रतिकात्मक आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले.


मी गेली अनेक वर्षे शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं जतन करत आहे. माझ्या प्रयत्नांमुळे रायगड किल्ल्याच्या संवर्धनाला सुरुवात झाली. यावरुन तुम्हाला माझी प्रामाणिक भावना दिसून येईल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली, यानंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही अरबी समुद्रातील स्मारकाचा समावेश होता. पण नंतर ते पाण्यात गेले. 2014 साली भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा उल्लेख केला. 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी घाईगडबडीत या स्मारकाचे जलपूजन उरकले. पंतप्रधान सर्व परवानग्या असल्याशिवाय जलपूजनाला येणार नाहीत. मात्र, त्यानंतर आठ वर्षे काहीच घडले नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले. 


आणखी वाचा


सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल