मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सहगल यांना संमेलनात परत बोलवलं जात नाही, तोपर्यंत संमेलनाला जाणार नाही, अशी भूमिका एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी घेतली आहे. तर असे प्रकार सुरुच राहिले तर संमेलनाला जाण्यात अर्थ नाही, असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.


ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या निमंत्रणाला शेतकरी न्याय हक्क समिती आणि मनसेनं विरोध केल्यानं आयोजकांनी त्यांचं निमंत्रण रद्द केलं आहे. यानंतर अनेक मान्यवरांनी आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.

साहित्य क्षेत्राचीच नव्हे तर मराठी समाजाचीही बदनामी : राजीव खांडेकर
ज्या प्रकारे आयोजकांनी नयनतारा सहगल यांना आंमत्रण दिलं आणि नंतर दहशतीखाली येऊन आमंत्रण रद्द केलं. त्यामुळे साहित्य क्षेत्राचीच नव्हे तर मराठी समाजाचीही बदनामी झाली आहे. नयनतारा यांचे वडील रणजीत पंडित हे मराठी होते, कोकणाचे होते. संस्कृतचे ते गाढे अभ्यासक होते. तसेच ते स्वातंत्र्य सैनिकही होते. महाराष्ट्राच्या कन्येला आमंत्रण देणं आणि नंतर त्यांना अपमानित करणं ही शरमेची बाब आहे. आयोजकांना अजूनही संधी आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी. सहगल यांची माफी मागावी आणि सन्मानाने त्यांना संमेलनाला येण्याची विनंती करावी. ज्या प्रकारे सहगल यांचा अपमान झाला आहे, एक मराठी माणूस म्हणून या गोष्टीचा निषेध म्हणून संमेलनाला न जाण्याचा मला निर्णय घ्यावा लागेल, असं राजीव खांडेकर म्हणाले.

शुद्रातील शुद्र घटना : गिरीश कुबेर
कोणीतरी धमकी देतो म्हणून आमंत्रण मागे घेणे ही शुद्रातील शुद्र घटना आहे. एक कवियत्री संमेलनाची अध्यक्ष असताना, दुसऱ्या लेखिकेला असं अपमानित करणं महाराष्ट्राच्या मराठी मातीसह अरुणा ढेरे यांचाही हा अपमान आहे. असे प्रकार सुरुच राहिले तर संमेलनाला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली.

राजीव खांडेकर आणि गिरीश कुबेर यांच्यासह ज्येष्ठ लेखिका आणि संपादिका विद्या बाळ यांनीही तीव्र शब्दात आयोजकांच्या निर्णयाचा विरोध केला. तसेच ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी आपण राजीव खांडेकर यांच्या मताशी सहमत असून आपणही संमेलनाला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

नयनतारा सहगल यांची प्रतिक्रिया


मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी घेतलेल्या निर्णयावर नयनतार सहगल यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीचे वाद समोर येत होते त्या पार्श्वभूमीवर जावं की नाही याचा विचार मी करत होते. मात्र मी यावं असा आयोजकांचा आग्रह होता. मात्र आयोजकांनी स्वत:च निर्णय घेत मला येऊ नका असं पत्राने कळवलं आहे, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.


मी माझं भाषण आधीच आयोजकांना पाठवलं होतं. मुख्यमंत्री माझ्याच व्यासपीठावर असणार आहेत हे मला माहीत नव्हतं. भाजपशासित राज्य आहे, त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना माझं भाषण आवडलं नसेल. माझ्या शब्दांमध्ये जरुर काही त्यांना घाबरवणारं असावं, असा अंदाज सहगल यांनी व्यक्त केला.


मी साहित्यिकांना आता देशात काय चाललंय, स्थिती का बिघडत चालली आहे, द्वेषाचं वातावरण का पसरवलं जातं आहे, हे हिंदू राष्ट्र आहे असं का सांगितलं जात आहे याबद्दल मी सांगणार होते, असं सहगल यांनी सांगितलं. कदाचित हे सगळं बोलणं आपल्या व्यासपीठावरुन ऐकणं मुख्यमंत्र्यांना सहन झालं नसतं, असंही सहगल म्हणाल्या


आयोजकांना वाईट परिस्थितीमध्ये हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे मी समजू शकते. यापुढेही मी महाराष्ट्रात येईल अशी मला आशा आहे. एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने यायला आवडेल, अशी इच्छाही सहगल यांनी व्यक्त केली.


कोण आहेत नयनतारा सहगल?

लेखिका नयनतारा सहगल या देशात 'पुरस्कार वापसी'ची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत. मात्र नंतर नयनतारा सहगल यांच्यासह 10 दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्वीकारत असल्याचं सहगल यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.

नयनतारा सहगल यांना त्यांच्या ‘रिच लाईक अस’ (Rich Like Us) या पुस्तकासाठी राजीव गांधीच्या कार्यकाळात म्हणजे 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. मात्र दिल्लीनजीक दादरी गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून बिसारा गावातील काही हिंदू तरूणांनी मोहम्मद अखलाख नावाच्या इसमाला ठार मारलं, म्हणून नयानतारा यांनी हा पुरस्कार परत केला होता.