मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमासाठी मोजून सोळा जणांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नेते नाराज होते. प्रकाश आंबेडकरांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलं आहे.


माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं अस मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही असंही त्यांनी म्हटलं. याआधी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. या जागेबाबतच्या अटलजींच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं, असंही आंबेडकर म्हणाले. मात्र, इथल्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली. त्यामुळे न्यायालयाला मी विनंती करतो की, त्यांनी पुतळयाचा आणि सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचा आदेश द्यावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


कार्यक्रम ऐनवेळी रद्द


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्याची पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी मोजून सोळा जणांना बोलवण्यात आले होते. ह्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, महापौर, स्थानीक आमदार सर्वणकर आणि स्थानिक दोन नगरसेवक, मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव अशा फक्त 16 जणांना आमंत्रण देण्यात आले होते. पण या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अशोक चव्हाण, जयंत पाटील यांच्यासारख्या सत्तेतील प्रमुख नेत्यांना आमंत्रण नव्हते. तर मंत्रिमंडळातील अनेकांना या कार्यक्रमाची कल्पना देखील नव्हती. आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी सत्ता येताच सर्वात आधी इंदू मिल इथे भेट देऊन आढावा घेतला होता. या कार्यक्रमाची कल्पना अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत नव्हती. नेहमीप्रमाणे ते पुण्याला निघूम गेले होते. त्यांच्या बैठक ठरल्या होत्या. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती. कार्यक्रम कळल्यावर ते बीडहुन निघाले. स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. त्यामुळे ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.


महत्वाच्या बातम्या : 

इंदू मिल आंबेडकर स्मारक : बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला!

इंदू मिल आंबेडकर स्मारक : बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी, अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकरांना निमंत्रण

...अन् पुण्यातून वाशीपर्यंत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार परत माघारी फिरले

Prakash Ambedkar | 'पुतळ्याची गरज नाही', डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका