मुंबई : "काय रे अलिबागवरुन आला आहेस का?", असं हिणवून अलिबागकरांचा विनाकारण अपमान का केला जातोय? या वाक्याविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.


समाजात विनोद हे सर्व स्तरांतील लोकांवर, समुदायाच्या लोकांवर होत असतात. त्यांना मनावर घेऊ नका, केवळ आनंद घ्या. अशी समजही याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.


सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्यानं काहीतरी ठोस पावलं उचलावित अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र मधूकर ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.




समाजात संता-बंता, मराठी, गुजराती भाषिक इतकंच काय तर परदेशी नागरीकांवरही जोक फिरत असतात. त्यामुळे त्यांना मनावर न घेता जोकला केवळ जोकप्रमाणेच घ्या. त्यांचा आनंद घ्या, अशी टिप्पणी करत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.


सिनेमा, नाटक, टीव्ही वरच्या मालिका यातनंच प्रचलित झालेला, "अरे अलिबागवरून आला आहेस का?" हा डायलॉग म्हणजे, "तू मुर्ख आहेस का?" या आशयाचे उद्गार उगाच विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणाची बदनामी करणारा आहे.




छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात त्यांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग वसवलं होतं. निसर्गरम्य समुद्र किनारे, सागरी किल्ले, देवस्थानं, अभयारण्य यांनी समृद्ध असलेला रायगड जिल्ह्यातील हा भाग मुंबई आणि पुणेकरांसाठीचं विकेण्डसाठी सर्वात आवडतं ठिकाण आहे.


त्याचबरोबर नव्यानं विकसित करण्यात आलेलं सरकारी आणि खाजगी उद्योगधंदे आणि प्रकल्प हे या ठिकाणाचं महत्त्व अधोरेखित करतात असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता.