इमारत हस्तांतरण प्रक्रिया आता आणखी सोपी
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 07:16 PM (IST)
अनेक किचकट प्रक्रियेनंतर सोसयटीकडे इमारतीच्या जमिनीची मालकी येते. मात्र, आता या सर्व जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : इमारतीचं हस्तांतरण आता सोपं होणार आहे. कारण डीम्ड कन्व्हेअन्स अर्थात मानीव अभिहस्तांतरणाला सरकारनं परवानगी दिली आहे. काल यासंदर्भातला अध्यादेश काढण्यात आला आहे. अनेक किचकट प्रक्रियेनंतर सोसयटीकडे इमारतीच्या जमिनीची मालकी येते. मात्र, आता या सर्व जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ बांधकाम सुरू झाल्याचा आणि पूर्णत्वाचा दाखला बाळगणाऱ्या इमारतींनाही सहजपणे डीम्ड कन्व्हेअन्स प्राप्त करता येणार आहे. ही प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी राज्य सरकारने मान्य केली. आणि तसा आदेश काढला आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत जमिनीच्या मालकीवरुन सोसायटी आणि विकासकांमध्ये वाद असल्याने अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. तो आता सुकर होईल.