नवी मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये थकलेले वीजबिल ग्राहकांना हप्त्याने भरण्याची सवलत महावितरण कंपनीने दिली आहे. त्यामुळे कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये नवी मुंबईकरांना पाठबळ मिळाले आहे. वीज मंडळांकडून ग्राहकांना विशेष सवलत मिळावी यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी घेतलेल्या महावितरण विभागाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


नवी मुंबई शहरातील वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी काल (26 जून) सिडको गेस्ट हाऊस येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. विविध कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाई बाबत त्यांनी महावितरणच्या प्रशासनाला जोरदार धारेवर धरले. महावितरणने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. ज्या ग्राहकाचे महिन्याचे बिल एक हजार रुपये आहे. त्याला चक्क चार लाख रुपयांचे बिल पाठवण्यात आलं आहे. याबाबत विचारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमध्ये नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे बिल थकबाकीदारांचे कनेक्शन कट करू नका, ग्राहकांना बिलाची थकबाकी भरण्यासाठी हप्ते पाडून द्या, अशा सूचना त्यांनी महावितरणला केल्या. त्या सर्व मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी मान्य केल्या आहेत. वाढीव आलेली बिले कमी करण्यासाठी आणि ज्यांना वीजबिल एकदम भरता येणार नाही, त्यांना बिलाचे हप्ते पाडून देण्यासाठी नवी मुंबई तीन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

काय? 79 कोटींचे वीजबिल! लघुउद्योजकास महावितरण विभागाचा झटका!

उत्सव मंडळांची अनामत रक्कम परत भेटणार

गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव मंडळांकडून महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम ठेवली जाते. उत्सव कालावधीत झालेले बिल या रकमेतून वजा करुन उरलेली रक्कम मंडळांना देणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून ही उर्वरित रक्कम महावितरणने मंडळाना दिलेली नाही. ही रक्कम मंडळांना परत करण्याची खासदार विचारे यांनी केलेली सूचना महावितरणने मान्य केली आहे.

घणसोलीच्या वीज समस्या सुटणार

घनसोलीमध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे घनसोलीकरांना वारंवार विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते. मात्र, आता यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलेले जाणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे घणसोली सुरू असलेला विजेचा लपंडाव लवकरच संपणार आहे.

Mahavitaran | कोरोनामुळं महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 30 लाखांचं अनुदान