मुंबई : भाजपने दहीहंडी उत्सव (Dahi Handi) वरळीमध्ये (Worli) साजरा करुन कितीही प्रयत्न केले तर यांची घागर उताणी राहणार आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी टीका केली आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यातच आता वरळीत भाजप विरुद्ध युवा सेनेत दहीहंडीवरुन युद्ध रंगणार आहे. भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात परिवर्तनाची दहीहंडीचं आयोजन केलं आहे. तर वरळी नाक्यावर युवा सेनेची हंडी लागणार आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. याच दहीहंडीचा एक टीझरही सध्या युवा सेनेकडून लाँच करण्यात आला आहे. 


याबाबत सचिन अहिर म्हणाले की, "भाजपने दहीहंडी उत्सव वरळीमध्ये साजरा करुन कितीही प्रयत्न केले तर यांची घागर उताणी राहणार आहे. आम्ही संकल्प केला होता आता हे परिवर्तन करायला निघाले आहेत. भाजपने कागदावर लिहून द्यावं की त्यांचा हा दहीहंडी उत्सव पुढचे पाच-दहा आयोजन वर्ष सुरु राहिल." फक्त निवडणुका जवळ आल्या की अशाप्रकारे आयोजन करायचं का? असा सवालही त्यांनी विचारला.


'...तर आम्ही त्यांना साथ दिली असती'


"आमच्या दहीहंडीची बरोबरी हे आणखी काही वर्ष तरी करु शकणार नाहीत. त्यांच्या या सगळ्या दहीहंडी उत्सवाला राजकीय रंग आहे. राजकीय माध्यमातून या सगळ्या उत्सवाचे नियोजन केलं जात आहे. वर्षभरापासून भाजपचे हे प्रयत्न या वरळीमध्ये सुरु आहेत, बाहेरचे लोकप्रतिनिधी येऊन इथे मराठी लोकांचा अपमान करता हे तुम्ही बघितलं. हे प्रयत्न जरी त्यांच्या सुरु असले तरी कुठल्याही जनतेचा प्रतिसाद त्यांना इथे मिळत नाही. स्वच्छ हेतू असता तर आमच्या काही लोकांनी त्यांना साथ दिली असती त्यांची गर्दी वाढवली असती. हे सगळं राजकीय हेतूमधून सुरु होतं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कोळी समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी वरळीत येऊन गेले, त्यात खुर्च्या किती खाली होत्या हे सांगायची गरज नाही," असंही सचिन अहिर म्हणाले.


पीआर वाढवण्यासाठी पैशांची उधळपट्टी केली जातेय, प्रो गोविंदाबाबत अहिर यांचा सवाल


प्रो गोविंदाबाबत बोलताना सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पीआर वाढवण्यासाठी पैशांची उधळपट्टी केली जातेय का असाही प्रश्न सचिन अहिर यांनी विचारला. "खाजगी आयोजकांनी जर यासाठी पुढाकार घेतला असता तर चांगलं झालं असतं सरकारी तिजोरीतून यासाठी पैसे जाणार आहेत. एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी हतबल आहे. असं असताना वरळी डोमचा रेंटल खर्च 15 लाख रुपये आहे, ते पंधरा लाख काय शासनाला फुकट देणार नाहीत. पैशांची उधळपट्टी आपला पीआर वाढवण्यासाठी केली जात आहे का हा प्रश्न आहे. आता त्याचं आयोजन का केलं जातं आहे? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एवढं मोठा आयोजन केलं जातं आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही तळागाळातले आहोत, आम्ही हंडी फोडणाऱ्यामधले आहोत, आयोजन कोणी करु द्या, हंडी आम्ही फोडतो," असं अहिर म्हणाले.



हेही वाचा


Dahi Handi 2023: गोविंदांना मिळणार विमा कवच; प्रो-गोविंदा स्पर्धेवरही शिक्कामोर्तब