मुंबई: रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींनी काल रावतेंची भेट घेतली. त्यावेळी रावतेंनी दरवाढ होणार नसल्याची ग्वाही दिल्याचं,  ग्राहक पंचायत प्रतिनिधींनी सांगितलं.


मंगळवारी झालेल्या या बैठकीला परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्त उपस्थित होते. तर मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे आणि वर्षा राऊत यांनी बाजू मांडली.

रिक्षा-टॅक्सी भाड्यात लवकरच दोन रुपयांनी वाढ होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्र्यांची भेट मागितली होती.

दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन दरवाढीची मागणी करत आहेत. सीएनजीच्या दरातील वाढ आणि जीवनावश्यक खर्च यानुसार भाडेवाढीची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षात सीएनजीचे दर प्रतिकिलो तीन रुपयांनी वधारले आहेत. याशिवाय वाहनाचा भांडवली खर्च, वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती खर्च, इन्शुरन्स, कर या बाबींमुळे भाडेवाढ करण्याचा तगादा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियनने लावला आहे. मात्र तूर्तास तरी परिवहन मंत्र्यांनी सामान्य प्रवाशांच्या बाजूने निर्णय घेत, भाडेवाढ होणार नसल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या  

मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या किमान दरात दोन रुपयांनी वाढ?   

आता रिक्षा, टॅक्सीसाठी कमर्शियल लायसन्सची गरज नाही!