मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे.


परंतु वेळापत्रकासह बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जारी केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे.

झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसंच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, येत्या परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

नियम 1 : परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही.

नियम 2 : परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे.

नियम 2 : विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल.

परीक्षा सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात येतं, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो. पण आता परीक्षेची वेळ सुरु झाली की विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्यातासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करुन ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.

परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना केवळ वॉशरुम वापरण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल, असंही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं. तसंच परीक्षेदरम्यान गैरप्रकार होणार नाही, याची काळजी पर्यवेक्षकांची आहे, असं मुंबई बोर्डाचे सचिव सिद्धेश्वर चांदेकर यांनी सांगितलं.

दरम्यान शिक्षकांनी या नव्या नियमांचं स्वागत केलं आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळ गैरप्रकार करतात, या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.