कल्याण : शिवसेना भाजपा हे गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत एकत्र असले, तरी चौकातल्या कुत्र्यांसारखे भांडत असतात, अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये झालेल्या पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यात मुंडे बोलत होते.


राज्यात आणि केंद्रात हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत, मात्र अक्षरशः चौकात जशी कुत्र्यांची झुंबड उडते, तसे हे दोन पक्ष एकमेकांशी भांडतात, असं धनंजय मुंडे म्हणाले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा केली, पण वाघाच्या तोंडात आता दातच नसल्याचं म्हणत मुंडे यांनी सेनेची खिल्ली उडवली.

तर दुसरीकडे अंबरनाथ पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी असल्याचा मात्र धनंजय मुंडे यांना विसर पडला. कारण अंबरनाथ शहरात रस्ते, उद्यानं, रुग्णालयं, स्विमिंगपूल नसल्याची टीका करत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

मात्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील हे याच टर्ममध्ये सलग दोन वेळा पालिकेचे बांधकाम सभापती होते, त्यामुळं मुंडेंनी टीका नेमकी कुणावर केली? अशी खसखस उपस्थितांमध्ये पिकली होती.