मुंबई : पालघर प्रकरणात आता राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. जमावाकडून तिघांची ठेचून हत्या झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलिसांच्या उपस्थितीत हिंसक जमावानं एखाद्याला ठेचून मारावं, हे भयानक कृत्य आहे. खरतंर अशा परिस्थितीत जमावबंदी मोडताच कामा नये, त्यासाठी पोलीस प्रशासनाने जास्त खबरदारी घेणं गरजेचं होतं. जेणेकरून एखाद्याच्या जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येणार नाही. अशा शब्दात मनावाधिकार आयोगानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.


याप्रकरणी पोलीस प्रशासनानं संबंधितांवर काय कारवाई केली?, बळी गेलेल्यांपैकी कुणाच्या कुटुंबियांना काय दिलासा दिला? याचा तपशील पुढील चार आठवड्यांत सादर करण्याचे मानवाधिकार आयोगाने पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.


पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका : शरद पवार


पालघर प्रकरणात नेमकं काय घडलं?


मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.


VIDEO | एका अफवेनं घडलं सर्वात भयंकर हत्याकांड, नेमकं काय घडलं होतं? स्पेशल रिपोर्ट


पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशबशी आपली सुटका करून घेतली. मात्र त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली.