मुंबई : नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारू या तरुणाचा मृत्यू झाला, असा आरोप करत कुटुंबीयांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याविषयी नायर रुग्णालय, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला एक आठवड्यात आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत.


नायर रुग्णालय आणि पालिका प्रशासनाने या दुर्घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तसेच सर्व दस्तावेज जपून ठेवावेत, असे आदेशही हायकोर्टाने दिले. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

राजेशची बहीण लीना मारू आणि त्याच्या आई-वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे. 'रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणाने आम्ही आमचा माणूस गमावला आहे. राजेश हा घरातील मुख्य कमावता पुरूष होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलाच आहे, परंतु त्यापेक्षा आम्हाला प्रचंड मानसिक आणि भावनिक यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश रुग्णालयाला द्यावेत', अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.

काय आहे प्रकरण?

27 जानेवारी रोजी राजेश नायर रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या सासूला पाहण्यासाठी आला होता. सासूला एमआरआय चाचणी करण्यासाठी एमआरआय केंद्रात आणण्यात आलं होतं. तेव्हा तिथे राजेशसोबत अन्य काही नातेवाईक होते. त्यावेळी आया सुनीता सुर्वेने सर्वांना अंगावरील धातूचे सर्व सामान काढून ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्वांनी काढले. त्यानंतर वॉर्डबॉय विठ्ठलने राजेशला ऑक्सिजन सिलिंडर आत नेण्याचे काम सांगितले. तेव्हा, सिलिंडरही धातूचाच असल्याचे काहींनी सांगितले. त्यावर, एमआरआय मशिन बंद असल्याने काही होणार नाही, असा दावा विठ्ठलने केला. मात्र, प्रत्यक्षात मशीन चालूच होती. त्यामुळे सिलिंडरसह आत शिरताच प्रचंड चुंबकीय शक्तीमुळे राजेश मशिनमध्ये खेचला गेला. त्याचा हात मशिन आणि सिलिंडरमध्ये अडकला आणि त्याचवेळी ऑक्सिजन लीक होऊन त्याच्या नाकातोंडात प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन जाऊन त्याचा देह नीळा पडला आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

याप्रकरणी राजेशच्या मेहुण्याने पोलिसांत तक्रार नोंदवली. फेब्रुवारीमध्ये कुटुंबीयांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर मार्चमध्ये मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. महापालिकेने याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने एप्रिलमध्ये दिलेल्या अहवालात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर स्पष्ट ठपका ठेवला आहे. त्यानंतर तो अहवाल मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकारात वारंवार विनंती करूनही रुग्णालयाने टाळाटाळ केली', असा आरोपही कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे.

संबंधित बातम्या :
एमआरआय मशिनने आत खेचलं, मुंबईतील रुग्णालयात तरुणाचा मृत्यू

मुंबईतील नायर रुग्णालयात तरुणाचा मृत्यू, डॉक्टरसह तिघे अटकेत

MRI मशीनजवळ काय काळजी घ्याल?