Mumbai Water Crisis : मुंबईत पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्यास मुंबईवर पाणी कपातीचे संकट अटळ आहे. मुंबईत 30 ते 35 (जुलै अखेर) दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. पावसाने हजेरी न लावल्याने मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांना फटका बसला आहे. मुंबईत दररोज 3850 दशलक्ष लीटर पाण्याची गरज असते. परंतु मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे


जून महिन्याच्या शेवटी मुंबई महापालिका पाणी साठ्याबाबत आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार आहे. आता धरण क्षेत्रात एकूण जलसाठा शिल्लक 160831 दशलक्ष लिटर आहे तर गेल्या वर्षी याच दिवशी जलसाठा 186719 दशलक्ष लिटर होता. 


तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
तलाव                  पाणीसाठा
अप्पर वैतरणा       0 
मोडक सागर         48357
तानसा                 6088
मध्य वैतरणा        23719
भातसा                76788
विहार                  3715
तुलसी                 2164


मुंबईसह उपनगरात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार : हवामान विभाग
पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (19 जून) मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातील पावसाचा जोर वाढणार आहे. यात कोल्हापूर आणि सातारा परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक निथा यांनी ही माहिती दिली