मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही : कुलगुरु
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2017 03:40 PM (IST)
लॉ आणि कॉमर्स विषयाचे सर्व निकाल येत्या चार दिवसात लावणं अशक्य असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात राज्य सरकारनं दिलेल्या दुसऱ्या डेडलाईनचाही बोऱ्या वाजणार आहे. 5 ऑगस्टच्या नव्या डेडलाईनलाही निकाल लागणार नसल्याची माहिती स्वतः कुलगुरुंनी दिली आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरुंनी नवी डेडलाईनही हुकणार असल्याची माहिती दिल्याचं युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. लॉ आणि कॉमर्स विषयाचे सर्व निकाल येत्या चार दिवसात लावणं अशक्य असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं. 15 ऑगस्टपर्यंत मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता कुलगुरु पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या घोळाविरोधात युवासेनेने कालिना विद्यानगरी संकुलाच्या गेटबाहेर आंदोलन केलं. शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. तावडे आणि देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी युवासेनेने केली. निकालासाठी याआधी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर 5 ऑगस्ट ही नवी डेडलाईन देण्यात आली. मात्र त्या डेडलाईनलाही आता तिलांजली मिळणार आहे.