Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मुंबईत आज 6 हजार 347 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 451 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 158 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 22 हजार 334 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 251 दिवसांवर पोहचलाय. 


मुंबईचे पालकमंत्री काय म्हणाले?
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागलीय. जर ही संख्या वाढली तर लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रात लोक खूप पॅनिक होतात आणि रुग्णालयात दाखल होतात. सध्या तरी अशी स्थिती नाही. मात्र, पुढेही कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास लॉकडाऊन घोषीत करावा लागेल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. 


आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी काय म्हटलंय?
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नसल्याचं सांगितलंय. परंतु, राज्यातील कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल, असे संकेतही राजेश टोपे यांनी दिलेत. 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे देखील रुग्ण वाढत चालल्याने राज्याची चिंता वाढली आहे. तसेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. तसेच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha