नवी दिल्ली : मुंबईमधील आज खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे. 2000 मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता, आता जवळपास सर्वच वीज पुरवठा सुरु झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी सोमवारी दुपारी दिली. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार असून अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे असेही ते म्हणाले.


मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाली होती. बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागातही वीज नव्हती. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाला. मुंबईतील मोठ्या भागातील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली होती.


अडीच तासांच्या ब्रेकनंतर मुंबई आणि उपनगरातील वीज पुरवठा पूर्वपदावर!


तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे?


महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर आणि नवी मुंबईमधील वीज खंडित झाली. याचा cascade effect मुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील वीज देखील खंडित झाली, अशी माहिती महावितरणने दिली. तसंच महापारेषण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. दीड ते दोन तासात वीज पूर्ववत सुरु होईल, असं महावितरणने सांगितलं होतं.


वीज खंडित होण्यामागील कारणे :




  • मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार 400 केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या 400 केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात व तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते. तसेच टाटा आणि अदानी यांचे एकत्रित 1800 मेगावॅट वीजनिर्मितीद्वारे वीजपुरवठा केला जातो.

  • त्या चार वाहिन्यांपैकी 400 के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 47 मिनिटाला या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तसेच झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर असे असले तरीही तेथे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

  • 400 के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-1 ही 12 ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून 33 मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. तसेच या वाहिनीचे बाधित इन्सुलेटर बदलण्याचे काम चालू होते. तरीही मुंबईतील वीजनिर्मितीद्वारे व उर्वरित दोन वाहिन्यांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत सुरू होता.

  • परंतु, सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी 400 के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-2 तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलॅंडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे 500 मेगावॅट आणि अदानीचे 250 मे.वॅ.चे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा बाधित झाला.


एमएमआर वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश


वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहावी जेणेकरुन अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितलं. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.



Mumbai Power cut | मुंबई उच्च न्यायालयातील वीजपुरवठा दोन तासानंतर सुरळीत