मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटक आणि मनसुख हिरण यांचा मृत्यू या प्रकरणांमुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्त कोण होणार, या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंह आपली कारकीर्द पूर्ण करणार का? की या आधीच त्यांची बदली होणार? असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. 


सचिन वाझे प्रकरणात सरकारची मोठी अडचण होताना दिसत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्तांवर याचं खापर फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची महत्वाच्या मंत्री आणि नेत्यांसोबतच्या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. 


सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस आयुक्त आपली कारकीर्द पूर्ण करतील का? असे सवालही उपस्थित होऊ लागले आहेत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरण यांचा मृत्यू या प्रकरणाचा तपास करणारा तपास अधिकाऱ्यालाच अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेवर शंकाकुशंका निर्माण केल्या जाऊ लागल्या आहेत. जे पोलीस आयुक्तांना चांगलच भोवलं आहे. सचिन वाझे यांच्या अटकेचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आता मुंबई पोलीस दलात ही उमटण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. 


मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली तर नवी मुंबई पोलीस आयुक्त कोण असणार याबाबतही अंदाज लावले जात आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी. के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम यांची नावं चर्चेत आहेत. 


रजनीश सेठ 


रजनीश सेठ हे 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्या रजनीश सेठ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. परमबीर सिंह जेव्हा मुंबई पोलीस आयुक्त झाले, तेव्हा रजनीश सेठ यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं. रजनीश सेठ हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. रजनीश सेठ यांचे वडील पुणे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी शरद पवार हे युवा नेता होते. मात्र शिवसेनेकडून रजनीश सेठ यांच्या नावाला सहमती मिळणं कठीण आहे.


डॉ. के. वेंकटेशम


डॉ. के. वेंकटेशम 1988 बॅचचे IPS अधिकारी असून ते सध्या स्पेशल ऑपरेशनचे पोलीस महासंचालक आहेत. वेंकटेशम जेव्हा पुण्याचे पोलीस आयुक्त होते, त्यावेळी भीमा कोरेगाव प्रकरण झालं. त्यामुळे शरद पवार यांच्यावर नाराज होते. त्यामुळे शरद पवार यांची नाराजी वेंकटेशम यांच्या विरोधात जाऊन शकते. तर दुसरीकडे वेंकटेशम हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात.


जयजीत सिंह


जयदीप सिंह सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत. जयजीत सिंह म्हणजे, स्वच्छ प्रतिमा आणि कुठल्याही वादात न राहणारे अधिकारी अशी ओळख आहे. 


सदानंद दाते


सदानंद दाते 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नव्याने झालेलं मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालायाचे सदानंद दाते हे पहिले पोलीस आयुक्त आहेत. 2008 साली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळालं होतं. तसेच एक धाडसी अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची ओळख आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी मराठी अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यास सदानंद दाते यांच्या नावासाठी शिवसेना तयार होऊ शकते. 


विवेक फणसाळकर


विवेक फणसाळकर हे 1989 बॅचचे अधिकारी आहेत. फणसाळकर सध्या ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना फणसाळकर यांच्या नावाची शिफारस करू शकते. 


दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ उभी करण्यामागे सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई पोलीस दलातील अजून काही वरिष्ठ अधिकारी असल्याचा संशय एनआयएला आहे. ज्यांची चौकशी येणाऱ्या दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. 


मुंबई पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?


सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस प्रमुखांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महत्वाची माहिती कशी पोहोचली? पोलीस दलातील आजही अनेक अधिकारी या प्रकरणातून फडणवीस यांना माहिती पोहचवत असल्याची बाब समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या मृत्यूपासून ते मनसुख हिरण यांच्या पत्नीच्या जबाबापर्यंत सर्व माहिती लीक झाली.  हा प्रश्न सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. यातही पोलीस आयुक्तांचे काहीच नियंत्रण नाही ते स्पष्ट होत आहे. गृह मंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे शरद पवार आपली प्रतिमा बिघडू देऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत तातडीने डॅमेज कंट्रोल म्हणून पोलीस आयुक्तांना हटविण्याचा विचार केला जात आहे. पोलीस आयुक्तांना काढून कडक संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :