मुंबई:   मुंबई महानगरपालिकेची (BMC)  मागील 25  वर्षाच ऑडिट केलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या  मागील 25 वर्षातील अर्थिक व्यवहारांचा ऑडिट होणार आहे.  यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे.  नियोजन, नगरविकास विभाग यांचे सचिव समितीमध्ये सहभागी असणार आहे. भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे


शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मागील 25 वर्षात  मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत 8 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी  हा फक्त ट्रेलर असल्याचं  सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचं म्हटलं  होते.  


मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न


मुंबईत शिवसेना आणि ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून त्यापार्श्वभूमीवर हे ऑडिट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  मुंबई महानगरपालिकेवर  कोणाचा ध्वज झेंडा फडकणार त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. भाजपाने या निवडणुकीसाठी पहिल्यापासूनच कंबर कसली होती.शिंदे गट सोबत आल्यानंतर आपलं महानगरपालिकेचं स्वप्न  सत्यात उतरेल असे भाजपला वाटत आहे. कारण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. 


भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील प्रमुख कंपन्यांची कार्यालयं ही मुंबईत आहेत. त्याचप्रमाणे देशातील सर्वाधिक कर हा मुंबईतून भरला जातो आणि या शहरातील अब्जाधीशांची संख्या ही शंभरहून जास्त आहे. त्यामुळे महापालिकेचं बजेटही मोठं आहे. तब्बल 52 हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या मुंबईच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतो.  गेल्या 30 वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. सन 2014 सालच्या आधी मुंबई महापालिकेची सत्ता काहीही मिळवायचीच यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले गेले, सर्व शक्ती पणाला लावण्यात आली. पण शिवसेना-भाजप युतीने सत्ता कायम ठेवली. आता शिवसेना आणि भाजप युती तुटली असून हे दोन पक्ष मुंबईसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 


मुंबई महापालिका ही शिवसेनेचा श्वास असून तो कसाही करुन रोखायचा यासाठी भाजपने यंदा जोरदार कंबर कसल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत पडलेली फूट आता सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय. पण तरीही मुंबईचा गड कायम राखण्यासाठी शिवसेनेकडून नव्या राजकीय जोडण्या लावण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.