मुंबई : हिंदू धर्म आवडत नसल्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचं सांगत मुंबईतून बेपत्ता झालेल्या तरुणाशी संपर्क झाला आहे. आपण सुखरुप असून आखाती देशात आहोत, अशी माहिती 23 वर्षीय जगदीश दलराम परिहारने कुटुंबीयांना फोन करुन दिली.

कामानिमित्त आपण आखाती देशात आल्याचं जगदीशने कुटुंबीयांना फोन करुन सांगितलं. एक किंवा दोन महिन्यात घरी परतण्याचं आश्वासनही त्याने दिलं. तो मुंबईतल्या मुलुंड कॉलनी परिसरात राहतो. 'मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे' असं फोनवर सांगत त्याने सर्व संपर्क तोडले होते.

जगदीश दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलिस ठाण्यात दिली होती. तो पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात होती.

वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकत आहे. परंतु गेलं वर्षभर तो फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबाने वारंवार त्याला हटकलं होतं. परंतु तरीही तो या तरुणीशी फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरुन संपर्कात होता.

दोन दिवसांपासून त्याने आपल्या बँक अकाऊंटमधून काही रक्कमही काढून घेतली होती. बेपत्ता होण्यापूर्वी त्याचं शेवटचं संपर्क ठिकाण हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखवत होतं. तिथूनच त्याने आपला भाऊ भावेशला शेवटचा फोन केला आणि मला हिंदू धर्म आवडत नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारला असून मला संपर्क करु नये, असं सांगितलं होतं.

जगदीशने सोबत स्वतःचे सर्व कागदपत्र आणि आवश्यक साहित्यही नेलं आहे. सध्या जगदीशने स्वतःचं अकाऊंटही फेसबुकवरुन डिलीट केल्याने पोलिसांना तपासात मोठ्या अडचणी येत होत्या. सध्या मुलुंड पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकही या घटनेचा तपास करत आहेत.