LokSabha Election 2024: लोकसभा निवडणुक 2024 च्या (Lok Sabha Election)  पाचव्या टप्प्यातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा घटता कल कायम राहिला आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं. मात्र या टप्प्यात 13 मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक राहिलीय. राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झालं. मुंबईत काल मतदान पार पडल्यानंतर दक्षिण मुंबईत (South Mumbai Loksabha) कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळालं. दक्षिण मुंबईत 47.70 टक्के मतदान झालं. दक्षिण मुंबईत 2019 च्या तुलनेत चार टक्के मतदान काल कमी असल्याचे पाहायला मिळालं. याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली, जाणून घ्या.


- काल नियोजनाचा प्रचंड अभाव जाणवला अनेक ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी आले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागत असल्याचं पाहायला मिळालं. पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांकडे वेगवेगळे ॲप होते. ज्यामध्ये मतदारांची नावे लगेचच मिळत होती. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना लिस्टमध्ये नाव शोधण्याचे वेळ आली होती. यातच अनेक वेळा वेळ जात असल्याचा पाहायला मिळालं, असं एका नागरिकाने सांगितलं. 


- दक्षिण मुंबईत गुजराती मतदार जास्त आहेत. अनेक सोसायटीमध्ये राहणारे नागरिक सदस्य सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाणं पसंत करतात. हीच परिस्थिती काल देखील जाणवली, असंही नागरिक म्हणाले.


- उन्हामुळे प्रचंड त्रास  जाणवत होता. नियोजन अतिशय ढिसाळ होतं. साधी पाणी पिण्याची व्यवस्था देखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोर जावं लागलं त्यामुळे अनेकांनी लांबच लांब रांगा पाहून मतदान न करन पसंत केल्याचं नागरिकाने सांगितले.


मुंबईत मतदानात ढिसाळ कारभार-


लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातले मतदानाचे पाचही टप्पे पार पडले. मात्र अखेरचा म्हणजे पाचव्या टप्प्यात मुंबई आणि एमएमआरमधील मतदानात ढिसाळ कारभाराचा अनुभव आला. ढिसाळ नियोजनामुळे अनेक मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान सुरू होतं. मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपून गेल्यावरही रांगा होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी, संताप आणि गोंधळाचं वातावरण आहे. मुंबईतील विलेपार्ले, उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील बिंबीसारनगर, बोरिवली, दहिसरसह अनेक भागात मतदानाला विलंब झाल्याची तक्रार मतदारांनी केलीय. निवडणूक आयोगाच्या बूथ नियोजनावर मतदार संतप्त झालेत. मतदानाला विलंब होत असल्याने काही जण मतदान न करताच निघून गेले. तर काहींनी तास तास उभं राहून मतदान केलं. आयोगाच्या ढिसाळ नियोजनावर मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. 


राज्यातील  आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी


दक्षिण मुंबई - 47.70
दक्षिण मध्य मुंबई - 51.88
उत्तर मध्य मुंबई - 51.42
उत्तर मुंबई - 55.21
ईशान्य मुंबई - 53.75
वायव्य मुंबई  - 53.67
ठाणे - 49.81
कल्याण - 47.08
भिवंडी - 56.41
पालघर -61.65
दिंडोरी - 62.66
धुळे- 56.61
नाशिक - 57.10



संबंधित बातमी:


मोठी बातमी! मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश