Mumbai Sanjay Gandhi National Park:  बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ( Borivali Sanjay Gandhi National Park) गुजरातमधील आशियायी सिंहाची जोडी दाखल झाली आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर आणि एक मादी) आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. सिंहाच्या या जोडप्याची भर पडल्यानं  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान वाढणार आहे. या सिंहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील वाघाची एक जोडी गुजरातला पाठवण्यात येणार आहे. 


राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार  (Sudhir Mungantiwar)  २६ सप्टेंबर रोजी गुजरात (gujrat) दौऱ्यावर गेले होते. तेव्हा गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी मुनगंटीवार यांनी सिंहांबाबत चर्चा केली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. आज अखेर गुजरातमधील आशियायी सिंह मुंबईत आले आहेत. तर लवकरच येथील वाघ गुजरातला रवाना होणार आहेत. 


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे 12 हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात मोठी वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात 17 वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता दोन सिंह आल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आणखी वाढणार आहे. 


तब्बल 70 वर्षांनंतर चित्ते भारतात!
70 वर्षांनंतर भारतामध्ये चित्ते परतले आहेत. यापूर्वी 1952 मध्ये देशातून चित्ताची प्रजात नष्ट झाली होती. भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात पुन्हा चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्तासाठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.


आणखी वाचा :
कोल्हापूर : सरपंच तुम्हीच व्हा; अर्ज भरल्याशिवाय अन्नाला शिवणार नाही! गावकरी महिलांसह ग्रामस्थांचा थेट घराला घेराव