Mumbai Bhayander Fire : मुंबईतील भाईंदर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या भाईंदर येथील झोपडपट्टी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. भाईंदर आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. भाईंदर पूर्वेकडील  गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आग लागली आहे. आज सकाळी ही अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीत काही जण जखमी झाल्याची  माहीती मिळत आहे.


भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मीरा-भाईंदर परिसरात लागलेली आग अतिशय भीषण असून अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे.


अग्निशमन दलाच्या जवानासह अनेक जण जखमी


भाईंदरच्या आझाद नगर भागात अग्नितांडव सुरु आहे. महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. मुंबई, ठाणे आणि वसई महानगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रे मागवण्यात आली आहेत, यावरून आगीची भीषणता समोर येत आहे.


24 अग्निशमक वाहन घटनास्थळी


भाईंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात असणाऱ्या आझाद नगर झोपडपट्टीला सकाळी 4.30 वाजता आग लागली. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आयुक्त संजय काटकर यांनी सांगितलं आहे. मात्र, एक अग्निशमक कर्मचारी जखमी झाला आहे. एकूण 24 अग्निशमक वाहन आग विझवण्याचं काम करत आहेत. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


पाहा व्हिडीओ : Bhayandar Fire : भाईंदरमध्ये आझादनगर झोपडपट्टीला आग



आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरुच


भाईंदर पूर्वेकडील आझाद नगर झोपडपट्टीला लागलेली आग अटोक्यात येत आहे. आझाद नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर, तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये मीरा-भाईंदर अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. आज सकाळच्या सुमारास ही आग लागली होती.


आगीत 50 पेक्षा अधिक दुकाने-घरे जळून खाक


पालिकेची आरक्षित जागा आहे. येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपडपट्टीचं साम्राज्य उभं राहिलं होतं. या आगीत 50 पेक्षा अधिक दुकाने आणि घरे जळून खाक झाली आहे. दिपक चौरसिया असं मयत व्यक्तीचं नाव आहे. तर, दोन मुलं यात जखमी झाले आहेत. तसेच शिवाजी सावंत हे मीरा-भाईंदर अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत.


आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची 24 वाहने काम करत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सात बंब, ठाणे महानगरपालिकाचे 4 बंब,  वसई विरार महानगरपालिकाचे 3 बंब, तर मीरा-भाईंदरचे 7 बंब आग विझवण्याचे काम करत आहे. 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Food Poisoning : शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; अकोला मनपा शाळेतील धक्कादायक प्रकार