मुंबई : मुंबईच्या किनाऱ्यापासून साडेचार सागरी मैलांवर बार्ज (मालवाहू जहाज)वरील वायुगळतीमुळे तीन खलाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 27 वर्षीय मंगेश भोसले, 23 वर्षीय जयंत चौधरी आणि 27 वर्षीय क्रितीक कोच या खलाशांचा मृत्यू झाला. तर गणेश बिट्टा आणि मोहम्मद दाऊद इब्राहिम कुरेय यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईजवळच्या समुद्रात ओरियन-2 या धान्यवाहू बार्जमध्ये शुक्रवारी रात्री वायुगळती झाल्याने तीन खलाशांचा गुदमरुन मृत्यू झाला, तर दोघांना तटरक्षक दलाने वाचवले. मुंबईच्या किनाऱ्यापासून साडेचार सागरी मैलांवर ही दुर्घटना घडली.

ओरियन-2 या बार्जवर वायुगळती झाल्याने खलाशी अत्यवस्थ असल्याची माहिती शुक्रवारी रात्री साडेदहाला तटरक्षक दलाला मिळाली. तटरक्षक दलाच्या सी-154 जहाज बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी रवाना झाले. बार्जच्या तपासणीत सांडपाण्याच्या टाकीतून वायुगळती झाल्याचे निदर्शनास आले.

वायुगळती झाल्यामुळे बार्जवरील चार खलाशांनी समुद्रात उड्या मारून स्वतःला वाचवले, परंतु पाच जण बार्जवरच बेशुद्ध पडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला, उर्वरित दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी एकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.