मुंबई : दोन महिन्या पासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांच्या मृतदेह पाहून पती व त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता बांगारे यांनी विष प्राशन करूनआत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला आहे.


भिवंडी तालुक्यातील उंबरखांड पाच्छापूर जंगलात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रीपत बच्चू बांगारे व त्यांची दुसरी पत्नी सविता बांगारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर पहिली पत्नी रंजना (वय 30), मुलगी दर्शना (वय 12), रोहिणी (वय 6) आणि मुलगा रोहित (वय 9) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. श्रीपत यांनी 21 ऑक्टोबरला हे चौघे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला एका झाडावरून दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने पहिले असता, झाडाला सडलेल्या अवस्थेत चारही मृतदेह आढळून आले. मृतदेहांच्या अंगावरील कपड्यांमुळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यानंतर पत्नी आणि 3 मुलांच्या मृत्यूंची बातमी मिळताच श्रीपतने विष व त्याच्या दुसऱ्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण पडघा पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तर फॉंरेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. तब्बल दोन महिन्यांपासून चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


श्रीपाद याने तीन महिन्यापूर्वी दुसरं लग्न केलं व त्यानंतर श्रीपादच्या पहिली पत्नी रंजना हिच्याशी वादविवाद सुरू झाले नेहमी त्यांच्यात भांडण होत होते. दोन महिन्यापूर्वी अचानक पणे शेतावर जात आहे असं सांगून संजना आपल्या मुलाबाळांसह घरातून निघून गेली व ती परत आली नाही अशी तक्रार तिच्या पती श्रीपाद याने वडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. मिसिंग गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस रंजना व तिच्या तीन मुलांचा शोध घेत होते. मात्र बातमी जी आली ती थेट त्यांच्या मृत्यूची या घटनेनंतर श्रीपाद व त्याच्या दुसऱ्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून श्रीपाद व त्याची दुसरी पत्नी सविता यांच्याविरोधात 306 व 498 कलमाअंतर्गत पडघा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गावापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गण्याचा डोंगरावर जंगलामध्ये एका झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन तीन मुलांसह आईने आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत.


काही दिवसापूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलीस तपासाअंती या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अशाप्रकारे झाडाला सडलेल्या व लटकलेल्या अवस्थेत चारही माय-लेकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.