मुंबई : T1 वाघिणीच्या मृत्यूच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. "अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. तसंच "वाघिणीला मारायची गरज नव्हती, तिला बेशुद्ध करायला हवं होतं. पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत," असंही ते म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.


वाघिणीला बेशुद्ध करुन संवर्धन करता आलं असतं

जी गोष्ट तुम्हाला वाचवता आली असती, ती तुम्ही वाचवली नाही. इतर आयुधं आपल्याकडे आहेत. तिला बेशुद्ध करुन संवर्धन करता आलं असतं. वाघ दुर्मिळ होत आहेत. ज्यांचे प्राण गेले आहेत, त्यांचंही वाटतंय. अशा गोष्टी जगभरात घडत असतात. ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचं वास्तव्य असतं तिथे वसाहती वसल्या तर अशा घटना घडतात, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

उद्या मुनगंटीवाराचं मंत्रिपद जाईल

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर सरकारवर विशेषत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे. याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, "या विषयावर मुनगंटीवार बेफिकीरीपणे उत्तर देत आहेत. ते वनमंत्री आहेत, याचा अर्थ त्यांना वनातलं सगळं कळतं किंवा त्यावर ते रिसर्च करत होते, असं नाही. ते आता मंत्री झाले आहेत, उद्या मंत्रीपद जाईल. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावं."

एक जीव गेला, सोबत आणखी दोन जीव जाणार

T1 वाघिणीला ठार केल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले आहेत. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. "आज त्या वाघिणीची दोन बछडे सापडत नाहीत. ती कुठे असतील. म्हणजे एक जीव गेलाय, त्यासोबत आणखी दोन जीव जाणार. यांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही काहीही केलं तरी आम्हाला काही होणार नाही. मला वाटतंय घोडा मैदान जवळ आहे. यांचा माज उतरणं अत्यंत आवश्यक आहे," असं ते म्हणाले.

अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?

अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला ठार केल्याचा आरोप सरकारवर होत आहेत. याविषयी राज ठाकरे यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. "वाघिणीला जिथे मारलं तिथून 60 किमी अंतरावर अनिल अंबानींचा प्रकल्प येत आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? अनिल अंबानी या सगळ्या गोष्टी करणार, त्याच्यासाठी सरकार विकलं गेलंय? त्यासाठी काम करत आहात का? इतकं भान सुटलं सरकारचं? कोण अनिल अंबानी? ही धेंडं सरकारने पोसावी आणि त्याचं नुकसान महाराष्ट्र आणि देशाने सोसायचं, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्यातलं सरकार हे मोदी सरकारच्या आशीर्वादाने बसलं आहे. ते आहेत तोपर्यंत हे आहेत. त्यांना माज आहे म्हणून यांना माज असल्याची टीकाही केली.

पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत

वाघ ही दुर्मिळ प्रजाती आहे. पुतळे उभारुन वाघ वाढत नसतात. हीच गोष्ट गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर केवढा हंगामा झाला असता.

वन्यप्राण्यांच्या भागात घुसूच नये

वन्यप्राण्यांच्या भागात घुसूच नये कोणी. ओसाड जागा असताना जंगलातच का शिरायचं असतं? यांना काही कर्तव्य नाही. कोण जगतंय, मरतंय याचं त्यांना देणं-घेणं नाही, त्यांना फक्त पुतळे उभारायचे आहेत. तिथे वल्लभभाईंचा पुतळा उभा करायचा, इथे वाघाचे पुतळे उभे करायचे. बस पुतळेच उभे करा.

सर्वाधिक बिबटे असलेली जगात एकमेव जागा आहे आणि ती म्हणजे मुंबईतील नॅशनल पार्क. ही जागा अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टीने वेढली जातेय. अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नसेल तर हे प्राणी तुमच्या घरात घुसणारच आहेत. जातील कुठे ते