मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाविरोधात वटहुकूम का आणला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला उत्तर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम केंद्र सरकार काढते, संसदेला तो अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान खूप तोकडं आहे. ते मंत्रालयाच्या आजूबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाही अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली आहे. लाठीहल्ल्याचा आदेश सरकारने दिला नाही, असा दावा होत असेल तर याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले. माफी मागून सरकार मलमपट्टी करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. 


मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर भाष्य केले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाकरे सरकारवर केली. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, अजित पवार यांना समजूतदार समजत होतो. मी संघनायक होतो, त्यावेळी मी चूकत होतो तर अजित पवार हे विकेटकिपर काय  करत होते, असा प्रश्न त्यांनी केला. आता जालनामध्ये जी डोकी फोडलीत त्याचं श्रेय टीमवर्क म्हणून घ्यावं. मी आधी गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो. आता तर, एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी दिली. सरकारला विरोध केला तर तो आवाज दडपला जात आहे. बारसूमध्ये ही लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. हे सरकार निर्घृण आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.


फडणवीस यांनी मंत्रालयाबाहेरही फिरकू नये


ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेलं. मविआ सरकारने वटहुकूम काढायला हवा होता, मुद्दा आज सरकारकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यालाही ठाकरे यांनी उत्तर दिले.  सुप्रीम कोर्टाच्या निकाल, आदेशाविरोधात वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्र सरकारला, संसदेला आहे. राज्य सरकारला वटहुकूम काढण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासू समजत होतो. देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान तोकडं आहे. मंत्रालयाच्या आजूबाजूला देखील फडणवीस फिरकण्याच्या कुवतीचे नाही असा ठाकरे यांनी म्हटले.


माफी मागणे ही मलमपट्टी 


राज्य सरकारने लाठीहल्ल्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, जनभावना विरोधात जात असल्याने ही माफी मागून मलमपट्टी करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. जालन्यातील घटनेबाबत सरकार माफी मागते, मग बारसू येथील लाठीचार्जबद्दल माफी का मागत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.