Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली.
प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे हाल झाले होते. अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिले होते. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम करावा लागल्याने मराठा आंदोलक चांगलेच वैतागले होते. सकाळी आजुबाजूला खाण्याचा काही पर्याय नसल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केली. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अनेक बस आणि टॅक्सी गेल्या तासाभरापासून येथे अडकून पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांनी अजूनही सीएसएमटीचा रस्ता रोखून धरला आहे. काही आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंघोळ केली. त्यामुळे या परिसरात सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. काही मराठा आंदोलक बसवर चढले आहेत. पोलिसांनी अनेकदा समजावूनही आंदोलक रस्त्यावरुन हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने शीघ्र कृती दल (Rapid Action Force) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची तुकडी रस्त्यावर उतरवली आहे. त्यामुळे आता याठिकाणी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Azad Maidan: आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल्स, खाऊगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद
मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम केल्यानंतर मराठा बांधवांनी आझाद मैदानाकडे कूच केले. मात्र, आज सकाळीही या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांनीच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली आहे. परभणीतील एका मराठा बांधवाने याठिकाणी नाश्त्याचा एक टेम्पो आणला आहे. याठिकाणी मराठा बांधवांना चहा, केळी आणि पोहे दिले जात आहेत.
आणखी वाचा
मुंबईतील पावसामुळे आझाद मैदानात चिखल, शौचालयात पाणी संपलं, बिसलरीच्या बॉटल आणून...
Maratha Reservatio LIVE: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, आझाद मैदानात धो-धो पाऊस