Maharashtra Police Transferred : राज्यात काल तब्बल 39 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या मात्र या बदल्यांवरून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. काल तडकाफडकी झालेल्या बदल्यांमध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधिक्षक आणि उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली गेली होती. मात्र हा निर्णय घेताना गृहमंत्र्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याची तक्रार मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. याबाबत माध्यमात बातमी आल्यानंतर त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांना संपर्क करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली आहे. 


राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माहिती देण्यात आली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या 12 तासांतच या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. याच आदेशाला गृहविभागानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमधील गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलात कालच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. मात्र, पत्रक काढून 12 तास उलटत नाही तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. 


आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती


बुधवारी गृह विभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी नाशिमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार होते. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बदली झाली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली होती. बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. तसंच पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संदीप कर्णिक यांचं पुण्यात पुनरागमन झालं होतं. पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता. इकडे मिलींद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली होती. भारंबे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :