मुंबई : सन 2022 च्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 27 जून 2022 पासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आज (दिनांक 8 जुलै 2022) पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात येत आहे.


मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत 27 जून 2022 रोजी 1 लाख 31 हजार 770 दशलक्ष लिटर म्हणजेच 9.10 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज 3 लाख 75 हजार 514 दशलक्ष लिटर  म्हणजे 25.94 टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.


मात्र, आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने महानगरपालिकेतर्फे लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या :