Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं चित्र दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं होतं. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...


हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं  


विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
 
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.


मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला


पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल


पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावरुन देखील आज तिसऱ्या दिवशी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 


25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


काळ्या अन् पांढऱ्या दाढीवाल्यांवरुन भुजबळांची टोलेबाजी! विधानसभेत फडणवीसांसोबत रंगली जुगलबंदी 


आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग