Aaditya Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरेला जंगल घोषित केलं आहे. याच कारशेडमध्ये आज बिबटे बघायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे हे देशातील क्लायमेट लिडर आहेत, असे कौतुक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई वातावरण कृती आराखडा (MCAP) अहवालाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.  


आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरण बदलावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वातावरण कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु. गेल्या दोन वर्षांपासून यावर काम सुरू आहे. 2050 पर्यंत कार्बन न्युट्रॅलिटीपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर काय पावले उचलावी लागतील? त्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्वे असायला हवीत? हे सर्व या कृती अराखडा अहवालात नमूद करण्यात आलं आहे. "


"गेल्या दहा वर्षात राज्यात आणि देशात मोठे बदल झाले आहेत. जिथे दुष्काळ होता तेथे आता पूर येत आहेत. जेथे पूर येत होता, तेथे दुष्काळ पडत आहे. मुंबईतही खूप बदल होत आहेत. अलिकडे मुंबईत मार्च महिन्यातच पाऊस पडत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघातील विषय कॅबिनेटमध्ये मांडत असतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे नुकसान भरपाई मागत असतो. परंतु, वातावरणामुळे हे नुकसान होत आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


"सध्या आपण तापमान वाढीचा मोठा सामना करत आहोत. मार्च महिन्यात मुंबईत एवढा उकाडा जाणवत असेल तर मे आणि जूनमध्ये काय परिस्थिती असेल? यंदा हिवाळा देखील कडाक्याचा होता. मुंबईत स्वेटर घालण्याची वेळ आली होती. या वातावरण बदलामुळे मोठे नुकसात होत आहे. त्यामुळे याला आळा घातला पाहिजे" असे अदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.  


महत्वाच्या बातम्या